निर्यातीवर ४०% शुल्क लागू केल्याने सर्व बाजारपेठा बेमुदत संपावर…

नाशिक, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाववाढ थांबविण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केले. हे ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत लागू असणार आहे. या निर्णया विरोधात आजपासून आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव सह नाशिक जिल्ह्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी संघटनांनी बाजारपेठ खरेदी-विक्री बेमुदत बंद पुकारला आहे. आता यात शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांनीही सहभाग घेतला आहे.
अशातच आता केंद्र सरकारने अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून २५ रुपये किलो या किरकोळ दराने कांद्याची विक्री राष्ट्रीय भारतीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) च्या माध्यमातून करणार आहे. कांद्याच्या ३.०० लाख मेट्रिक टन प्राथमिक खरेदीचे उद्दिष्ट गाठल्यानंतर, सरकारने यावर्षी कांद्याच्या राखीव साठ्याचे (बफर) प्रमाण ५.०० लाख मेट्रिक टन केले.
प्रमुख बाजारपेठेत कांदा पाठवण्याव्यतिरिक्त, बफरमधील कांदा किरकोळ ग्राहकांना देखील २५ रुपये प्रति किलो अनुदानित दराने किरकोळ दुकाने आणि एनसीसीएफच्या फिरत्या वाहनाद्वारे आज २१ ऑगस्ट २०२३ पासून उपलब्ध करून दिला जाणार आहे. इतर संस्था आणि ई-वाणिज्य मंचाचा समावेश करून आगामी काळात कांद्याची किरकोळ विक्री योग्यरित्या वाढवली जाईल. असे सरकारचे धोरण आहे.
कांदा निर्यातीवर ४०% कर आकारल्याने यामुळे निर्यात कमी होणार असल्याने कांद्याचे भाव पुन्हा कोसळण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे .आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आणि बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यात बेमुदत संप पुकारला आहे.
ML/KA/SL
21 Aug 2023