शेतकऱ्यांसमोर खत टंचाईचे संकट? CRU Group च्या ताज्या अहवालात मिळाले संकेत
नवी दिल्ली,दि. १९ : खरीपाचा हंगाम तोंडावर आलेला असताना आणि यावर्षी मान्सूनही वेळेत पोहोचण्याची चिन्हे असताना शेतकऱ्यांसमोर आता एक नवीन संकट उभे राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनपुरवठ्यावर लगाम लागलेला असताना यामुळे आता खतांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याचे CRU ग्रुपच्या ताज्या अहवालातून दिसून येत आहे. सीआरयू ग्रुपच्या अहवालाचा दाखला देत समोर आलेल्या एका वृत्तानुसार, ‘इंडियन पोटाश लिमिटेड’ (IPL) ने देशांतर्गत गरजांसाठी तब्बल ५,२१,००० टन अमोनियासाठी टेंडर जारी केले होते. मात्र, जागतिक पुरवठादारांकडून केवळ २,३९,००० टनांसाठीच बोली (Bids) लावण्यात आली. मागणीच्या तुलनेत आलेला हा अत्यंत कमी प्रतिसाद ही भारतासाठी चिंतेची बाब ठरणार आहे.
खत उद्योगासाठी अमोनिया हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. नायट्रोजनयुक्त खतांच्या निर्मितीसाठी अमोनियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. याशिवाय, पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी पोटाशसोबत अमोनियाचा वापर करतात.भारत खतांसाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत, जागतिक बाजारात कोणतीही अडचण आल्यास त्याचा थेट परिणाम भारतातील खतांचा पुरवठा आणि त्यांच्या किमतींवर होतो.
दरम्यान या संकटावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून रासायनिक खतांचा वापर कमीत कमी करण्याचे आवाहन केले जात आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून सरकारने शेतकऱ्यांना पारंपरिक युरियाऐवजी ‘नॅनो युरिया’ (Nano Urea) चा अधिक वापर करण्याचा सल्ला दिला आहे,
SL/ML/SL