मुंबई हल्ल्यातील दहशतवादी राणा अखेर भारताच्या ताब्यात

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २६/११ ला मुंबईवर झालेल्या हल्ल्यातील दहशतवादी तहव्वूर राणा याला भारताच्या हवाली करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. लवरकच तहव्वूर राणाचे आता अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्यात येईल. तहव्वूर राणा सध्या लॉस एंजल्स येथे तुरूंगात आहे. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी आणि लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी डेविड हेडलीशी त्याचे संबंध असल्याचा आरोप राणावर आहे.
मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अमेरिकेच्या ‘यूएस कोर्ट ऑफ अपील्स फॉर द नाइन्थ सर्किट’ न्यायालयाने प्रत्यार्पण करारानुसार तहव्वूर राणाला भारताच्या स्वाधीन केले जाऊ शकते, असे सांगितले होते. “मुंबईवर केलेला दहशतवादी हल्ला योग्यच होता”, अशी कबुलीही राणाने दिल्याचे सुनावणी दरम्यान न्यायाधीश मिलान स्मिथ यांनी सांगितले होते. त्यानंतर राणाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.राणाला ही शेवटची संधी होती. याआधी त्याने अमेरिकेच्या विविध न्यायालयांमध्ये केलेले अपील फेटाळले गेले होते. आता सर्वोच्च न्यायालयानेही त्याची याचिका फेटाळून त्याचे प्रत्यार्पण करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.
मुंबई हल्ल्याच्या ४०५ पानांच्या आरोपपत्रात आरोपी म्हणून राणाच्या नावाचाही उल्लेख आहे. त्यानुसार राणा हा आयएसआय आणि लष्कर-ए-तैयबाचा सदस्य आहे. आरोपपत्रानुसार राणा हल्ल्याचा मुख्य आरोपी डेव्हिड कोलमन हेडली याला मदत करत होता.
26 नोव्हेंबर 2008 रोजी लष्कर-ए-तैयबाच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला. त्यापैकी 166 लोकांचा मृत्यू झाला. 300 जण जखमी झाले. मृतांमध्ये काही अमेरिकन नागरिकांचाही समावेश आहे. या चकमकीत पोलिसांनी 9 दहशतवाद्यांना ठार केले आणि अजमल कसाबला अटक केली. त्याला 2012 मध्ये फाशी देण्यात आली.
SL/ML/SL
25 Jan. 2025