गुढीपाडवा : गुढी उभारू सौख्याची, ऐक्याची आणि समृद्धीची

 गुढीपाडवा : गुढी उभारू सौख्याची, ऐक्याची आणि समृद्धीची

राधिका अघोर

गुढीपाडवा म्हणजेच चैत्र महिन्याचा पहिला दिवस- शुक्ल प्रतिपदेला हिंदू भारतीय नववर्षांची सुरुवात होते. महारष्ट्रात गुढीपाडवा म्हणून साजऱ्या होणाऱ्या ह्या सणाला हिंदू नववर्ष म्हंटले जाते. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात युगादी, सिंधमध्ये चेती चांद अशा नावांनी हे नववर्ष साजरं केलं जातं. उंच गुढी उभारून, इंद्रध्वज म्हणून तिची पूजा केली जाते.

गुढीपाडव्याच्या सणाच्या वेळी,शेतीची नवी पिकं आली असतात, ह्या पिकांचे पदार्थ, म्हणजे वेगवेगळी कडधान्ये. डाळी यांच्या उसळी, कैऱ्यांचे पदार्थ, पन्हं असा सगळा बेत केला जातो. शहरी भागात अनेक ठिकाणी श्रीखंड किंवा आम्रखंड -पुरी असा बेत असतो. अनेक ठिकाणी, कडुलिंबाची कोवळी पानं किंवा त्यांची चटणी केली जाते. थोडक्यात, त्या हंगामातील धान्य आणि ऋतुमानानुसार प्रकृतीला आवश्यक असे पदार्थ गुढीपाडव्याला केले जातात.
मंदिरं, रस्त्यांवर सुंदर रोषणाई करून ते सजवले जातात.

गुढीपाडव्याचे आणखी एक आकर्षण म्हणजे, शोभायात्रा. मुंबई, ठाणे, डोंबिवली, पुणे यांच्यासह अनेक शहरात गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढल्या जातात. स्त्रिया-पुरुष पारंपरिक वेशात या शोभायात्रांमध्ये सहभागी होतात. महिलांची बाईक रॅली, ढोल-ताशे लेझीम यामुळे ही शोभायात्रा अत्यंत नेत्रसुखद आणि आकर्षण असते. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी असते.
चैत्र महिन्यापासून आपलं नववर्ष सुरु होतं. या दिवशी, गुढीला गाठी, आंब्याची डहाळी,कडुलिंबाची डहाळी, फुलांची माळ नवे वस्त्र किंवा भगवा ध्वज लावून गुढी उभारली जाते. ही गुढी, विजयाचे, यशाचे, ऐश्वर्याचे प्रतीक मानली जाते. याच दिवशीपासून चैत्र नवरात्राची सुरुवातही होते. देवीचे चैत्र नवरात्र आणि प्रभू श्रीराम यांचं नवरात्र गुढीपाडव्यापासून ते रामनवमी पर्यंत असतं.

कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या आणि स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयदिन म्हणून संवत्सर पाडवो वा उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो.

शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते.

आपल्याकडे प्रत्येक सणाचा वर्तमानाशी संबंध जोडला जातो. कारण हिंदू संस्कृती काळानुरूप बदलत गेली आहे. अद्ययावत होत गेली आहे. त्याचप्रमाणे आजचा गुढीपाडवा, नववर्षाची सुरुवात, समृद्धीची, ऐक्याची, भरभराटीची सुरुवात ठरो. आज भारतासमोर जी आव्हाने आहेत, ती या नव्या वर्षात दूर होवोत, यंदाच्या वर्षात आपण जे संकल्प केले आहेत, ते पूर्ण होवोत. देशात भरपूर उत्तम पाऊस पडू दे. धनधान्य विपुल होऊ दे. अशी प्रार्थना सगळ्यांसाठी करण्याचा हा दिवस आहे.

सर्वांना गुढीपाडवा आणि नववर्षाच्या अनेक शुभेच्छा !! हे वर्ष प्रत्येकाला सुख, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येणारे ठरो.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *