ई-ऑफिस प्रणाली तालुकास्तरावर राबविणारा राज्यातील पहिला जिल्हा
वर्धा, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वसामान्य नागरिकांना जलद, पारदर्शक आणि कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यासोबत शासकीय कामकाज अधिक स्मार्ट व गतिमान होण्यासाठी राज्यात ई-ऑफिस प्रणाली राबविली जात आहे. या प्रणालीचा तालुकास्तरावर अवलंब करणारा वर्धा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी उपविभागीय कार्यालयात ही प्रणाली कार्यान्वित केल्यानंतर आर्वी उपविभागातील तालुक्यांमध्ये ही प्रणाली सुरु करण्यात आली आहे. टप्याटप्याने संपुर्ण जिल्ह्यात ती कार्यान्वित केली जाणार आहे.
राज्य शासनाच्या महाआयटी या कंपनीद्वारे ही प्रणाली राबविण्यास काही वर्षांपासून प्रारंभ झाला. सुरुवातीच्या काळात केवळ मंत्रालयात या प्रणालीचा अवलंब केला जात होता. त्यानंतर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये ई-ऑफिस प्रणालीने जोडली गेली.
सर्व स्तरावरील शासकीय कामकाज ई-ऑफिस प्रणालीद्वारे करण्याचे शासनाचे धोरण आहे. या धोरणानुसार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी वर्धा येथे रुजू झाल्यानंतर तीनही उपविभागीय कार्यालयांमध्ये ही प्रणाली कार्यान्वित केली.
तालुकास्तरावर देखील ही गतीमान प्रणाली कार्यान्वित झाली पाहिजे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसिलदारांशी चर्चा केली. तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणे घेतली आणि या प्रणालीच्या वापरास सुचना केल्या. त्यासाठी आवश्यक तांत्रिक सहाय्य महाआयटीच्या
वतीने तालुक्यांना उपलब्ध करून दिले. पहिल्या टप्प्यात आर्वी उपविभागातील आर्वी, कारंजा व आष्टी या तालुक्यात प्रणाली कार्यान्वित झाली आहे.
सर्वसामान्य नागरिकांची कामे गतीने निकाली निघावी, त्यांचा त्रास आणि पैसा वाचावा यासाठी ही प्रणाली अत्यंत उपयोगी ठरली आहे. शासकीय विभागांच्या विविध फाईल्स प्रत्यक्ष या टेबलवरुन त्या टेबलवर फिरतात. ई-ऑफिसच्या पेपरलेस कामकाजामुळे फाईली ऑनलाईन सादर होतात आणि ऑनलाईनच पुढे जात असल्याने फाईलींचा निपटारा वेळेत होतो, शिवाय कामात पारदर्शकता, गतिमानता देखील येते. सर्वसामान्य नागरिकांचे कार्यालयांमध्ये येणारे अर्ज, विनंत्या, तक्रारी या देखील ई-ऑफिसद्वारे सादर होत असल्याने त्यावर देखील कालमर्यादेत कारवाई होते.
आर्वी ठरला पहिला तालुका
जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयानंतर तहसील कार्यालये ई-ऑफिस करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी आर्वी उपविभागातून सुरुवात करण्यात आली. या विभागातील आर्वी तालुक्याने ई-ऑफिसला प्रारंभ केला. राज्यात हा तालुका या प्रणालीचा वापर करणारा पहिलाच तालुका ठरला आहे. त्यानंतर कारंजा व आष्टी तालुक्याने देखील ई-ऑफिसला प्रारंभ केला आहे.
ML/KA/SL
29 March 2023