कोकणात यलो अलर्ट सह चक्रीवादळाचा इशारा

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गत काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्यपूर्ण बदल होत आहेत. एकीकडे उन्हाच्या झळांनी नागरिक त्रस्त झाले आहेत तर दुसरीकडे अवेळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडत आहेत. गेल्या आठवड्यात कोकणातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली त्यामुळे तयार होत आलेल्या आंबा आणि काजू पिकाच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्याने बागायतदार चिंतेत आहेत. त्यातच आज हवामान विभागाने कोकण विभागात यलो अलर्टसह पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे यामुळे समुद्रातील नौकाही सुरक्षित स्थळी उभ्या करण्यात आल्या आहेत.
कर्नाटकच्या समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर २९ आणि ३० मार्च या कालावधीत विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळे आंबा बागायतदार धास्तावले असून, मच्छीमारांनी आपल्या नौका किनाऱ्यावर नांगरुन ठेवल्या आहेत. पुढचे दोन दिवस दिवसा तापमानात २ ते ३ डिग्री सेल्सियसने वाढ होऊ शकते. तर रात्री तापमान २ ते ३ डिग्री सेल्सियसने घसरण्याची शक्यता आहे.