लोकल अपघाताची सखोल चौकशी करा, मृतांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई व जखमींचा संपूर्ण खर्च करा

मुंबई, दि 10
मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडून झालेली घटना रेल्वे विभागाचा ढिसाळ व बेजबाबदार कारभार जबाबदार आहे. लोकल मधील गर्दीमुळे रेल्वेतून पाच प्रवासी खाली पडून मृत्यूमुखी पडले, हे पूर्णपणे टाळता येण्यासारखं होतं.
पण रेल्वे मंत्र्यांना रिल काढणे व पंतप्रधानांना हिरवा झेंडा दाखवून चमकोगिरी करण्याशिवाय रेल्वेबाबत काही गांभीर्य नाही. या अपघाताची सखोल चौकशी करून मृतांच्या कुटुंबीयांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, जखमींवर संपूर्ण उपचार करावे आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
या अपघातासंदर्भात प्रतिक्रीया देताना खासदार गायकवाड म्हणाल्या की, ही दुर्घटना पुन्हा एकदा अधोरेखित करते की मुंबईतील रेल्वे नेटवर्क मग ते उपनगरी असो वा लांब पल्ल्याच्या गाड्या अजूनही सुरक्षित नाहीत. वाढती गर्दी, व्यवस्थापनातील निष्काळजीपणा आणि अपुऱ्या सोयीसुविधांमुळे दररोज हजारो प्रवाशांचे प्राण धोक्यात येतात. हे प्रश्न आम्ही अनेकदा संसदेतही उपस्थित केले आहेत. रेल्वेला आता सोशल मीडियावरच्या ‘रील्स’ नव्हे, तर रिअल कामाची गरज आहे. एक नाही, अनेक दुर्घटनांनंतरही जबाबदारी घेण्याची तयारी सरकारमध्ये नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वेमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.