राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवस : डाकिया डाक लाया…

– राधिका अघोर
सत्तरीच्या दशकात, राजेश खन्नाचा एक हिंदी सिनेमा, ‘ डाकीया ‘ खूप गाजला होता. या चित्रपटात राजेश खन्ना एक पोस्टमन असतो, जो गावोगावी पत्र पोहचवत असतो. या त्याच्या रोजच्या भेटीतून, त्याचा गावाशी, तिथल्या माणसांच्या सुख दुःखांशी कसा बंध जुळतो, याची नाट्यमय कथा या सिनेमात होती. यातला नाट्याचा भाग सोडला, तरी पोस्टमन ही भारतातल्या घरोघरी येणारी अत्यंत महत्वाची व्यक्ती होती आणि बहुतांश घरी त्यांची खूप वाट बघितली जात असे, हे तर अगदी सत्य आहे.
भारतीय टपाल सेवा इंग्रजांनी सुरू केली, त्याला आता दीडशे वर्ष झालीत. स्वातंत्र्यपूर्व काळात तर ही सेवा अनेकांच्या आयुष्याचा महत्वाचा भाग होती. आणि म्हणूनच ही सेवा पुरवणारे लोक, म्हणजे ते टपाल विभागात काम करणारे कर्मचारी असोत किंवा मग घरोघरी टपाल पोहचविणारे पोस्टमन असोत, त्यांनी अनेकांच्या आयुष्यात नातेवाईकांचे बंध जोडले. आनंद – दुःखाच्या बातम्या पोहोचवल्या. नंतर मनीऑर्डर पोचवल्या. सुमारे 25 -30 वर्षांपूर्वी जे बाहेरगावी शिकायला राहत असतील, अशा लोकांना किंवा मग नोकरी करणाऱ्या मुलामुलीकडून गावच्या घरी पाठवली जाणारी मनी ऑर्डर याचं महत्त्व तेच लोक सांगू शकतील.
आज आपल्याकडे पत्र पाठवण्याची परंपरा जवळपास लोप पावली आहे.एवढा वेळ ही नाही कुणाकडे आणि संपर्काची अधिक सोपी, जलद साधने आल्यानंतर कोणी पुन्हा जुन्या साधनांकडे कशाला वळेल? पण म्हणून पोस्टल सेवा कमी झालेली नाही. कालानुरूप त्यातही बदल झाले आहेत. आणि ही कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाचा आवाका वाढला आहे, तसेच स्वरूपही बदलले आहे. पार्सल सेवा आजही सुरूच आहे त्याशिवाय, इतर अधिकृत कागदपत्रेही सरकारी टपाल सेवेद्वारेच पाठवली जातात. त्याशिवाय काही वर्षांपूर्वी टपाल खात्याला पोस्ट पेमेंट बँक म्हणून दर्जा देण्यात आला. भारताच्या प्रत्येक गावात पोहचलेल्या या एवढ्या मोठ्या सेवेचा पेमेंट बँक म्हणून होणारा वापर अनेकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला आहे. आज अनेकांच्या खात्यात विविध योजनांचे थेट जमा होणारे पैसे त्यांना या पोस्ट पेमेंट बँकेद्वारेच मिळतात. घरोघरी जाऊन टपाल कर्मचारी, पोस्टमन हे पैसे त्यांना पोहचवतात.
त्याशिवाय, आर डी, किसान विकास पत्र, इंदिरा विकास पत्र, संजय गांधी निराधार योजना अशा योजनांचे पैसे ही गरजूंना टपाल सेवेद्वारे मिळतात.
काळानुसार, टपाल सेवा आधुनिक होत आहे, मात्र हे करतांना या सेवेला असलेला माणूसकीचा स्पर्श सोडलेला नाही, हे खूप विशेष आहे.
मात्र आज अशा संपर्क सेवा अत्यंत वेगाने विकसित होत असताना, टपाल सेवेनेही आपला वेग वाढवणे आवश्यक आहे. कात टाकणे आवश्यक आहे, तरच भविष्यातही ही सेवा टिकून राहील, अधिकाधिक विकसित होत राहील.
गेली दीडशे वर्षे संपूर्ण भारताला जोडून ठेवणाऱ्या या सेवेचे आणि ही सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आजच्या टपाल सेवा कर्मचारी दिवसानिमित्त खूप खूप आभार आणि अभिनंदन!
पुढच्या वेळी तुमच्या कडे पोस्टमन काका आले, तर त्यांच्या या अविरत सेवेबद्दल कृतज्ञता बाळगत त्यांना एक ग्लास पाणी किंवा एखादा गुळाचा खडा किंवा एक चॉकलेट नक्की द्या.
1 July 2024