अविवाहित मतदारांसाठी ऑफर : मत द्या, नवरी मिळावा
चंदीगढ, दि. ७ : सध्या देशभर अविवाहित तरुणांच्या विवाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक गावखेड्यांमध्ये अनेक तरुण सुयोग्य वधु मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. शेतकरी तरुणांना लग्नासाठी मुली न मिळण्याची समस्याही गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या एका महिला आमदाराने तरुणांना वधु शोधूण देण्याची गॅरेंटी देत मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
हरयाणातील रेवाडीमध्ये नगर परिषद निवडणुकीची रणधूमळी सुरू आहे. इथं भाजपच्या एका महिला आमदाराने प्रचारादरम्यान दिलेले अजब आश्वासन चर्चेचा विषय ठरले आहे. ‘आधी मतदान करा, मग लग्न लावून देते’, असे आश्वासन पटौदीच्या भाजप आमदार बिमला चौधरी यांनी दिले आहे. त्यांच्या या लग्नाच्या गॅरंटीची चर्चा सगळीकडेच आहे.
रेवाडी नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या उमेदवार विनीता पीपल यांच्या प्रचारासाठी एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना बिमला चौधरी यांनी थेट अविवाहित तरुणांना साद घातली. त्या म्हणाल्या, “रेवाडीतील कोणताही मुलगा आता अविवाहित राहणार नाही. तुम्ही भाजपला मतदान करा, मी तुमच्या सर्वांची लग्ने लावून देईन.” आधी मत द्या मग नवरी मिळवा अशी थेट ऑफरच त्यांनी गावातल्या तरुणांना दिली. त्यामुळे ही ऑफर की लग्नाचे गाजर आहे अशी चर्चा ही रंगली आहे. यावेळी मंचावर हरियाणाच्या आरोग्यमंत्री आरती राव देखील उपस्थित होत्या. आमदारांचे हे अनोखे आश्वासन ऐकून त्यांनाही हसू अनावर झाले.
राजकीय सभांमधील गांभीर्य हरवत चालले असताना, मतदारांना अशा भावनिक आणि विनोदी आश्वासनांनी भुलवण्याचा हा प्रकार लोकशाहीतील प्रचाराची खालावलेली पातळी दर्शवतो की केवळ एक विनोद, यावर आता चर्चा सुरू झाली आहे.
SL/ML/SL