महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी मनोज कनोजिया प्रथम
मुंबई, दि. १३
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या वतीने आयोजित व ऊर्जा संवर्धनावर आधारित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केले आहे. सांताक्रूझ (पश्चिम) येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हिंदी माध्यमिक शाळेचा विद्यार्थी मनोज रामकिशोर कनोजिया (इयत्ता १० वी) याने या स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचा नावलौकिक वाढवला आहे.
‘ऊर्जा संवर्धन’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कठीण स्पर्धेतून मनोजने अभ्यासपूर्ण मांडणी, विषयाचे सखोल आकलन आणि प्रभावी लेखनशैलीच्या जोरावर परीक्षकांचे लक्ष वेधून घेत प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातील सुवर्णा पाटील या विद्यार्थिनीने दुसरा; तर अहिल्यानगर जिल्ह्यातील वेदांती वाणी या विद्यार्थिनीने तिसरा क्रमांक पटकावला.
शैक्षणिक अभ्यासक्रमांसह विद्यार्यां जचे अवांतर वाचन आणि लेखन कौशल्य वाढावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभाग विविध उपक्रम राबवत असतो. सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यावर शिक्षकांचा भर असतो, अशी माहिती शिक्षणाधिकारी श्रीमती सुजाता खरे यांनी दिली.
शिक्षक, शाळेचे मुख्याध्यापक तसेच पालकांनी या यशाबद्दल मनोजचे अभिनंदन केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधूनही गुणवत्ता आणि स्पर्धात्मक यश साध्य होऊ शकते, हे या यशाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.KK/ML/MS