कॉपीमुक्त परीक्षेचा विद्यार्थ्यांनी घेतला धसका, केंद्रावर शुकशुकाट
जालना दि २२– एकीकडे राज्यात सध्या 12 वीच्या परीक्षेची धूम सुरु आहे.यंदा कॉपीमुक्त परीक्षेसाठी जोरदार प्रयत्न केले जातायत.जालन्यातही शिक्षण विभागाबरोबरच जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रयत्न करून परीक्षा केंद्रांवर भेटी देत आहेत.
काल जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी कॉपी करताना १६ विद्यार्थ्यांना रंगेहाथ पकडलं आहे.त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलंय.
आज जालन्यातील जामवाडी येथील रंगनाथराव पाटील परीक्षा केंद्रावर हिंदी विषयाच्या परीक्षेसाठी एकही विद्यार्थी फिरकला नाही.
त्यामुळे परीक्षा केंद्रावर पोलीस, केंद्रप्रमुख यांच्यासह सर्वांना ताटकळत बसावं लागलं. आज १२ वीचा हिंदी विषयाचा पेपर होता.हिंदी हा विषय दोनच विद्यार्थ्यांनी घेतलेला होता.मात्र केंद्रप्रमुखांनी दोन्हीही विद्यार्थ्यांना फोन लावून परिक्षेला बोलावले तरीही विद्यार्थी परीक्षेसाठी आले नाहीत.
त्यामुळे परीक्षा केंद्रावर परीक्षा वेळेत शुकशुकाट पाहायला मिळाला.एकही विद्यार्थी परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी न आल्यानं शिक्षकांना देखील पेपर न घेताच रिकाम्या हातानं परीक्षा केंद्रावरून मागे परतावं लागलं.
ML/KA/SL
22 Feb. 2023