पहलगाम प्रकरणी चीन करतोय पाकिस्तानची पाठराखण

नवी दिल्ली (एप्रिल २८): पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता जबाबदारी नाकारत पाकिस्तानने जगाची सहानुभूती मिळवण्यासाठी कांगावा सुरू केला आहे. भारताला शह देण्यासाठी चीनने यावादात उडी घेत पाकला समर्थन दिले आहे. पहलगाम प्रकरणी चीनने “त्वरित व न्याय्य तपासणी” करण्याची मागणी केली असून पाकिस्तानला त्याच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षा हितांच्या संरक्षणामध्ये समर्थन दिले आहे.
भारतासोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने आपल्या मित्राला समर्थन व्यक्त केले आहे.चिनी परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी रविवारी पाकिस्तानचे उपपंतप्रधान व परराष्ट्रमंत्री इसहाक दार यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला, असे सरकारी प्रसारमाध्यम शिन्हुआ वृत्तसंस्थेने सांगितले.
दार यांनी वँग यांना “काश्मीर प्रदेशातील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील वाढत्या तणावाबाबत” माहिती दिली. वँग हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (सीपीसी) केंद्रीय समितीच्या राजकीय ब्युरोचे सदस्यही आहेत. चीनने या घटनेवर चिंता व्यक्त केली आणि तणाव कमी करण्यासाठी उपाययोजना सुचविल्या.