मुंबई ते गोवा प्रवास होणार फक्त ६ तासांत
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेले कित्येक वर्ष मुंबई-गोवा महामार्ग रखडलेला आहे. मात्र लवकरच नवीन चौपदरी मुंबई-गोवा महामार्ग प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. सध्या गोव्याला जाण्यासाठी 12 तासांहून अधिक वेळ लागतो. मात्र आता हा वेळ अर्ध्यावर येणार आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. मे किंवा जून 2025पर्यंत पूर्ण होणार आहे. यामुळे यावर्षी गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुकर होणार अशी आशा निर्माण झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्ग एकूण 466 किमीचा आहे. रस्त्याचं काम झाल्यानंतर केवळ 6 तासात मुंबईहून गोवा गाठता येणारे आहे. या मार्गादरम्यान 41 बोगदे आणि 21 पूल उभारले जाणार आहेत. माणगाव, इंदापूर, पाली, लांजा, कोलाड आणि चिपळूण या गावात बायपास आणि पुलांचे बांधकाम सध्या सुरू आहे. महामार्गाला होत असलेल्या विलंबामुळं प्रकल्पाचा खर्च ७,३०० कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.
या महामार्गावर एकूण 14 ठिकाणांहून वाहनांना प्रवेश करता येणार आहे. 14 वर्षांपूर्वी या एक्स्प्रेस वेच्या उभारणीचं काम सुरू करण्यात आलं होतं. मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणामुळेहा महामार्ग नवी मुंबईतील पनवेलपासून सुरू होऊन रत्नागिरीमार्गे जाणार आहे. या महामार्गाचा 84 किमी लांबीचा पनवेल-इंदापूर विभाग भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)कडून विकसित करण्यात येत आहे. तर, उर्वरित भागाचे रुंदीकरण सार्वजनिक विभाग करत आहे. पावसाळ्यापूर्वी महामार्गाचे बहुतांश काम पूर्ण होणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
SL/ML/SL
4 Feb. 2025