२० हत्ती झाले वेठबिगारीतून मुक्त

 २० हत्ती झाले वेठबिगारीतून मुक्त

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अरुणाचल प्रदेशातील वृक्षतोड उद्योगासाठी वापरल्या जाणाऱ्या या २० हत्तींना वनतारामध्ये आश्रय मिळणार आहे, त्यामुळे हे 20 हत्ती साखळदंडमुक्त आयुष्य जगणार आहेत. अतिशय बुद्धीमान आणि शक्तीशाली प्राणी अशी ओळख असलेल्या हत्तींना जंगलात महाकाय वृक्ष तोडण्याच्या कामाला लावले जाते. अशाच २० हत्तीची आता या कष्टाच्या कामातून मुक्तता होणार असून अनंत अंबानी यांनी बंदिवासात असलेल्या हत्ती आणि इतर प्राण्यांसाठी स्थापन केलेलं बचाव केंद्र ‘वनतारा’ येथे आता या हत्तींना पाठवण्यात येणार आहे. हत्तीची मुक्तता त्रिपुरा उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या आणि सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलेल्या उच्चाधिकार समितीच्या मान्यतेने करण्यात आली आहे. तसेच बचाव कार्य सुरु करण्यापूर्वी जनावरांच्या मालकांचीही पूर्ण संमती मिळवण्यात आली होती.

हत्तींना खास डिझाईन केलेल्या वाहनातून त्यांना नेले जाईल. वनतारा येथील हत्ती पशुवैद्य, पॅरावेट्स, सिनीअर केअरटेकर्स आणि रुग्णवाहिका चालकांसह 200 हून अधिक तज्ज्ञांचा खास चमू, वाहतूक मार्गदर्शक तत्त्वे आणि प्राणी कल्याण मानकांचे पालन करून हत्तींची वाहुतक सुरक्षितरित्या होईल याची खात्री करतील.

सुटका करण्यात आलेल्या हत्तींमध्ये 10 वर्षांची लक्ष्मी आहे. लक्ष्मीला खोल आणि उपचार न झालेल्या जखमांमुळे मागच्या पायांवर वजन वाहून नेताना त्रास होतो. तसंच लक्ष्मीच्या उजव्या कानाला एक इंच व्यासाचे छिद्र पडलं आहे, ज्यामुळे तिला असह्य वेदना होत आहेत. या दोन्ही जखमा तिच्यावर नियंत्रण मिळवण्याच्या क्रूर प्रक्रियेत निर्माण झाल्या आहेत. वृक्षतोडीच्या कामात वापरण्यात येणाऱ्या हार्नेसमुळे हत्तींच्या छातीवर आणि पृष्ठभागावर मोठ्या जखमा झाल्या आहेत. रामू या मोठ्या हत्तीचे दोन्ही पुढचे आणि मागचे पाय त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी चार ते सहा महिने बांधून ठेवण्यात आले होते, यामुळे त्याला मोठ्या प्रमाणावर शारिरिक आणि मानसिक त्रास झाला आहे.

अनेक वर्ष बंदिवासात असल्यामुळे या हत्तीने स्वत:चा बचाव करण्यासाठी आवश्यक असलेली नैसर्गिक प्रवृत्ती गमावली आहे. हत्तींची आजीवन काळजी घेण्यासोबतच वनतारा प्रकल्पामध्ये हत्तींचे मालक, माहुत आणि त्यांच्या कुटुंबियांना उपजीविकेच्या नवीन संधी उपलब्ध करून दिली जात आहे. माहूत आणि इतर सगळे हत्ती व्यवस्थापनाच्या मानवी आणि वैज्ञानिक पद्धतींचे सखोल प्रशिक्षण घेतील जेणेकरून भविष्यात हत्तींची योग्यप्रकारे काळजी घेतली जाईल. या प्रशिक्षणामुळे हत्तीची काळजी घेणाऱ्यांना आवश्यक ते ज्ञान आणि कौशल्य प्राप्त होईल. संस्थेने वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 अंतर्गत सर्व आवश्यक कागदपत्रे मिळवली आहेत, ज्यात गुजरात वन विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र आणि अरुणाचल प्रदेश वन विभागाकडून वाहतूक परवान्याचा समावेश आहे.

ML/ML/SL

27 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *