आजच्या माध्यमांसमोर विश्वासार्हतेचे मोठे आव्हान

 आजच्या माध्यमांसमोर विश्वासार्हतेचे मोठे आव्हान

ठाणे, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आजच्या माध्यमांसमोर विश्वासार्हता हे सगळ्यात मोठे आव्हान असून हातात आलेली बातमी वाचकांसमोर जाण्यापूर्वी त्याची सत्यता तपासून पाहण्याचे मोठे आव्हान या निमित्ताने उभे राहिले आहे. तंत्रज्ञान जरी पुढे गेलेले असले तरी विश्वासार्हता हे माध्यमांचे मर्म आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे असे मत ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित यांनी व्यक्त केले . ठाण्यात रोटरी क्लब च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार सत्कार कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

पूर्वीच्या काळी मुद्रित माध्यमांचा मोठा प्रभाव होता. त्यात आलेल्या बातम्या आधी उपसंपादक मग मुख्य उपसंपादक त्यानंतर वृत्त संपादक आणि संपादक अशा पद्धतीने ताडून पाहिल्या जात होत्या. मात्र सध्याचे तंत्रज्ञान खूप प्रगत असल्यामुळे माहितीचा सतत ओघ सुरू आहे, यात माहितीची सत्यता तपासून पाहत न पाहता ती प्रसिद्ध केली जाते यामुळे समाज माध्यम आणि प्रसार माध्यम यांच्यावर विश्वासार्हता राखणे हे मोठे आव्हान निर्माण झाले आहे असे दीक्षित यावेळी म्हणाले. ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ यांनी यावेळी दीक्षित यांना बोलते केले होते.

माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांनी कायम सजग राहून चौफेर दृष्टी ठेवत सातत्याने समृद्ध होण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे मिलिंद बल्लाळ यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले रोटरी क्लब च्या वतीने पत्रकारितेमध्ये पन्नास वर्षे पूर्ण केलेल्या मिलिंद बल्लाळ यांच्यासोबतच पत्रकारितेत किमान वीस वर्षे पूर्ण केलेल्या पंधरा पत्रकारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दिनेश मेहता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. क्लबच्या गव्हर्नर स्वाती येरी, कार्यक्रमाच्या संयोजक नीता निंबाळकर यांनी स्व . बाळशास्त्री जांभेकर जयंती दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

ML/ML/PGB 5 Jan 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *