जोमदार पावसाने वर्षा पर्यटनाला आला बहर…

सिंधुदुर्ग, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पावसाळा सुरू झाला की पर्यटकांची पावले सिंधुदुर्ग कडे वळतात .सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रवाहित होणारे धबधबे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात .यंदा पावसाळा उशिरा सुरू झाला असला तरी गेले दहा दिवस जिल्ह्यात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील धबधबे पूर्णपणे प्रवाहित झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्य आकर्षण असलेला आंबोलीचा धबधबा या ठिकाणी पर्यटकांची गर्दी ओसंडून वाहत आहे .
विशेषतः आठवडा अखेर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक कर्नाटक , गोवा तसेच महाराष्ट्रातील ठिकठिकाणाहून येतात . मोठ्या प्रमाणात आलेल्या पर्यटकांच्या गाड्यांमुळे तसेच हा अरुंद घाट रस्ता असल्याने या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी होते . पोलीस पर्यटकांच्या उत्साहाला आवर घालण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी बंदोबस्तासाठी उपस्थित असतात .मात्र हजारोंच्या येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमुळे काही काळ वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी तेदेखील हतबल ठरतात .
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली, सावडाव , नापणे ,न्हावन कोंड हे धबधबे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहेत . या ठिकाणी क्षणात संपूर्ण परिसर धुक्याने भरून जातो , तर क्षणात धो धो पाऊस सुरू होतो . येथील निसर्गरम्य विलोभनीय दृश्य टिपण्यासाठी मोठ्या संख्येने निसर्ग छायाचित्रकार देखील येतात . सर्वच धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांनी अतिउत्साह न दाखवता शिस्तीचे पालन करावे असे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनाने केले आहे.
ML/KA/SL
10 July 2023