आधुनिक वाल्मिकी ‘ गदिमांच्या ‘ घरात पंचवटीवरून रामायण
पुणे, दि. ११ : मराठी रसिकांना गीतरामायणाचा अनमोल ठेवा देणारे आधुनिक वाल्मिकी गजानन दिगंबर माडगूळकर अर्थात प्रख्यात कवी, गीतकार आणि लेखक गदिमांच्या पुणे येथील ‘पंचवटी’ ‘या निवासस्थानावरून वाद निर्माण झाले आहेत. गदिमांचे नातू सौमित्र माडगूळकर यांनी असा आरोप केला आहे की, घरातील जवळचे नातेवाईकच बिल्डरच्या मदतीने ही वास्तू पाडण्याचा आणि आर्थिक फायद्यासाठी पुनर्विकास (Redevelopment) करण्याचा दबाव टाकत आहेत. पंचवटी’ पाडण्याला विरोध केल्यामुळे नातेवाईकांकडून आपल्याला आणि आपल्या पत्नीला खोट्या आरोपांद्वारे बदनामी केली जात असून, जीवाला धोका असल्याचेही सौमित्र माडगूळकर यांनी म्हटले आहे.
सुमित्र यांनी लिहिलंय, “गदिमांनी हयात असताना असे म्हंटले होते की जोपर्यंत माझे घर पंचवटी आहे तो पर्यंत माझे अस्तित्व या जगात राहील.गदिमांची पवित्र वास्तू पंचवटी पाडावी/ बिल्डरला विकावी असा दबाव आमच्या घरातील अगदी जवळच्या नातेवाईकांकडून (अगदी ते लोक ज्यांनी पंचवटीवर, गदिमांवर मोठी मोठी पुस्तके लिहिली आहेत ते या कटात सामील आहेत,केवळ लोकांना दाखवायला ते गदिमांचा वारसा सांगतात पण प्रत्यक्षात त्यांचे पंचवटी पाडण्याचे प्रयत्न चालू आहेत). फक्त पैशांसाठी हे लोक गदिमांची पवित्र वास्तू पाडत आहेत. ज्या पवित्र वास्तूमध्ये गीतरामायण लिहिले गेले जी अनेक साहित्यिक कलाकृतींची साक्षी आहे.गदिमांचा अनेक वर्षांचा सहवास ज्या वास्तूला लाभला ती पाडावी म्हणून हे लोक प्रयत्न करत आहेत व त्याला मी विरोध केल्यामुळे आता माझ्या जीवावर उठले आहेत.यात माझा जीव गेला तरी बेहत्तर.”
सुमित्र यांनी पुढे लिहिलंय, “गेली 10 वर्षे मी गदिमांच्या स्मारकासाठी लढतो आहे व माझ्या लढ्यामुळे स्मारकाची इमारत आता पूर्ण झाली आहे,आतल्या कामाला आता सुरुवात होईल.गदिमांचे स्मारक जितके महत्त्वाचे आहे तितकीच गदिमांची पंचवटी माझ्या साठी एक देऊळ आहे,या लोकांनी माझी कितीही बदनामी केली.”
SL/ML/SL