गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच धावली रेल्वे
गडचिरोली, दि. १७ : गडचिरोलीतील आरमोरीपर्यंत आज पहिल्यांदाच रेल्वे मालगाडी धावली असून गडचिरोलीच्या औद्योगीकरणासाठी ही रेल्वे सेवा (Railway) महत्त्वाची ठरणार आहे. येथील 18 किमी रेल्वे रुळाचे काम पूर्ण झाल्याने मालवाहू गाडीची चाचणी घेण्यात आली. गडचिरोली जिल्ह्याला राज्यातील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा बनवणार असून लाखो रोजगारनिर्मिती जिल्ह्यात होणार असल्याचं जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी म्हटलं होतं.
वडसा-गडचिरोली या 52 किलोमीटर रेल्वे मार्गाचे काम सध्या सुरू असून सद्यस्थितीत वडसा-आरमोरी या 18 किलोमीटर रेल्वे मार्गाचे काम 60 ते 70 टक्के पूर्ण झाले आहे. कामासाठी विविध साहित्य ट्रकद्वारे आणले जात आहे. अशातच आरमोरी पर्यंत 18 किलोमीटर रेल्वे रुळाचे काम पूर्ण झाल्याने गुरुवारी मालवाहू गाडीची चाचणी घेत इलेक्ट्रिक खांब थेट छत्तीसगडच्या भिलाई येथून आरमोरीत पोहोचले आहेत. प्रथमच मालवाहू रेल्वेचे आरमोरी शहरात आगमन झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी 1 हजार 886 कोटींचा वाढीव निधी मंजूर असून यातील अर्धा खर्च राज्य सरकार करत आहे. रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्यातील 322 कोटी रुपयांच्या कामांची प्रत्यक्षात सुरुवातही झाली आहे.
गडचिरोलीला औद्योगिक व खनिज केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी रेल्वे वाहतूक महत्त्वाची ठरणार आहे. गडचिरोली जिल्हा लोखंड व खनिज उत्पादनासाठी ओळखला जातो. रेल्वे मार्गामुळे स्टील व खनिज उद्योगांना मोठा फायदा होईल.
SL/ML/SL