लेखिका प्रतिभा रानडे यांना मसाप जीवनगौरव तरडॉ. श्रीकृष्ण काकडे यांना कार्यकर्ता पुरस्कार
पुणे दि २० : महाराष्ट्र साहित्य परिषदेचा १२१वा वर्धापन दिन समारंभ व पुरस्कार प्रदान सोहळा मंगळवार, २६ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आला असून मसाप जीवनगौरव पुरस्काराने प्रसिद्ध लेखिका प्रतिभा रानडे यांचा तर डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराने डॉ. श्रीकृष्ण काकडे यांचा गौरव केला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, कार्यवाह अंजली कुलकर्णी, सुनील महाजन, डॉ. आशुतोष जावडेकर उपस्थित होते. वर्धापन दिन समारंभ आणि पुरस्कार प्रदान सोहळा दि. २६ रोजी मे रोजी दुपारी ४ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ संगीतकार, गायक पंडित सत्यशील देशपांडे, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते हृषिकेश जोशी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग व मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
राजा फडणीस पुरस्कृत उत्कृष्ट मसाप शाखा करंडक मसाप शाखा गुहागरला तर रत्नाकर कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मसाप उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार दिनेश देशमुख (आटपाडी, जि. सांगली) आणि अश्विनी चव्हाण (सोलापूर) यांना दिला जाणार आहे.
राजन लाखे पुरस्कृत डॉ. बाबुराव लाखे स्मृती वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार मसाप शाखा दक्षिण सोलापूरला, डॉ. राजा दीक्षित पुरस्कृत म. श्री. दीक्षित यांच्या स्मरणार्थ मसाप स्नेहबंध पुरस्कार अशोक सुलाखे यांना दिला जाणार आहे. या प्रसंगी विशेष ग्रंथपुरस्कार, वार्षिक ग्रंथ पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर सायंकाळी ७:३० वाजता प्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी ‘द मनमौजी’ हा कविता व गीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. निनाद सोलापूरकर (की-बोर्ड), आमोद कुलकर्णी (तबला) साथसंगत करणार आहेत. वर्धापन दिन आणि पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे दुपारी ३:३० वाजता अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.ML/ML/MS