अन्यथा दारात कांदे ओतू
नाशिक दि २२ (एमएमसी न्यून नेटवर्क) : कांद्याच्या प्रमुख बाजार समित्यांमधील विक्रीदर ४५० ते ६०० रुपयांपर्यंत खाली कोसळल्याने महाराष्ट्रभरातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सरकारी यंत्रणांनी मान्य केलेला कांद्याचा उत्पादन खर्च ८५० ते ९०० रुपये प्रति क्विंटल आहे. मात्र राज्यात आजमितीला कांद्याला प्रतिक्विंटल केवळ ४५० रुपये ते ६०० रुपये भाव मिळत आहे. कांद्याचा उत्पादनखर्च तर सोडाच या दरात काढणी आणि वाहतुकीचा दरही भरून निघत नाही.
राज्यातील भाजप शिंदे सरकारने या पार्श्वभूमीवर तातडीने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने सरकार व राज्यातील सत्ताधारी पक्ष सत्तेच्या साठमारीत मशगुल आहेत. कोणत्या पक्षाला कोणते चिन्ह मिळाले, कोणाचे आमदार अपात्र झाले, कोणाचे सरकार टिकणार यातच सत्ताधारी पक्षांनी महाराष्ट्राला गुंतवून टाकले आहे. शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. सरकारने शेतकऱ्यांची ही संतापजनक उपेक्षा थांबवा अशी मागणी किसान सभेने केली आहे.
कांदा उत्पादकांना तातडीने मदत करावी अशी मागणी किसन सभा करत सरकारने कांदा उत्पादकांना मदत करण्यासाठी हस्तक्षेप न केल्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पणनमंत्री व कृषिमंत्री यांच्या दारात कांदे ओतण्याचे आंदोलन किसान सभा हातात घेईल असा इशारा किसान सभेने दिला आहे.
मागणी आहे काय
कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कांद्याला तातडीने निर्यात अनुदान देत कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्यावे व कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल ६०० रुपये अनुदान जाहीर करावे अशी मागणी किसान सभेने केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील बारे गावी शेतकऱ्यांची जिल्हास्तरीय जाहीर सभा घेऊन किसान सभेने हा इशारा दिला आहे. किसान सभेच्या नाशिक जिल्हा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संपन्न झालेल्या या जाहीर सभेसाठी जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसोबत कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कांद्याचे दर निश्चित करणाऱ्या लासलगाव, पिंपळगाव बसवंत, सिन्नर, मनमाड, चांदवड व नांदगाव बाजार समित्या, तसेच नगर व पुणे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या सभा आयोजित करून कांदा उत्पादकांसाठी आक्रमक आंदोलन उभे करण्याचा संकल्प किसान सभेने केला आहे.
ML/KA/SL
22 Feb. 2023