भारतीय जहाजांसाठी १२,९८० कोटींचे विमा संरक्षण
मुंबई, दि. १८ :
जागतिक स्तरावर वाढत्या तणाव आणि अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या सागरी व्यापाराला संरक्षण देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत मॅरिटाइम फंड Bharat Maritime Fund) स्थापन करण्यास मंजुरी दिली असून, यामधून १२,९८० कोटी रुपयांचे विमा संरक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. या निधीमुळे भारतीय ध्वज असलेल्या तसेच भारतात येणाऱ्या आणि येथून निघणाऱ्या जहाजांना परवडणाऱ्या दरात विमा संरक्षण मिळणार आहे. धोकादायक सागरी मार्गांवरही हा विमा लागू होणार असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
या उपक्रमामुळे सागरी विमा क्षेत्रात जोखीम मूल्यांकन (Underwriting), दावे हाताळणी (Claim) आणि कायदेशीर प्रक्रियांमध्ये देशांतर्गत कौशल्य वाढणार आहे. तसेच भारतीय जहाज वाहतुकीच्या गरजेनुसार विमा सेवा विकसित करण्याचा उद्देश आहे. या विमा योजनेत जहाजांचे सांगाडे आणि यंत्रणा (Hull & Machinery), मालवाहतूक, प्रोटेक्शन अँड इंडेम्निटी (Protection & Indemnity – P&I) आणि युद्ध जोखीम यांचा समावेश असेल. सदस्य विमा कंपन्यांकडून सुमारे ९५० कोटी रुपयांच्या संयुक्त जोखीम वहन क्षमतेवर (Underwriting Capacity) पॉलिसी जारी केल्या जातील.
SL/SL/ML