फळपिक शेतकऱ्यांना ४ दिवसांचा ‘विमा’ दिलासा

मुंबई, दि. २ :– हवामान आधारित फळ पिक विमा योजनेच्या मर्यादित कालावधीत केंद्रसरकारने मुदतवाढ करून राज्यातील फळपिक शेतकऱ्यांना ४ दिवसांचा ‘विमा’ दिलासा दिल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योग्य समन्वयामुळे पिक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना आता ०६ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करता येणार असल्याचे कृषी मंत्री अॅड. कोकाटे यांनी सांगितले.
हवामान आधारित फळ पिक विमा योजनेंतर्गत मृग बहार २०२५ मध्ये द्राक्ष, पेरू, लिंबू, संत्रा, चिकू, मोसंबी या पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्यासाठी अंतिम दिनांक ३० जून २०२५ होती, मात्र २७ जून २०२५ पासून आधार संकेतस्थळाबाबत समस्या असल्याने विमा अर्ज करण्यामध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी शेतकरी बांधवांकडून येत होत्या. याबाबत केंद्र सरकारशी योग्यवेळी समन्वय साधल्याने एकूणच परिस्थितीचा विचार करून दिनांक ०३ जुलै २०२५ ते दिनांक ०६ जुलै २०२५ असे एकूण ४ दिवसवरील पिकांकरिता फळ पिक विमा योजनेत भाग घेण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या www.pmfby.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन विमा योजनेचा अर्ज करावा, असे आवाहन कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. ML/ML/MS