भिवंडीला लॉजिस्टिक हबसाठी समिती, आ. रईस शेख यांचा समावेश

मुंबई दि १:– भिवंडी मध्ये आशिया खंडातील सगळ्यात मोठा लॉजिस्टिक हब बनविण्यासाठी सरकार एक समिती गठीत करेल आणि त्यात उद्योग, नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांसह भिवंडी पूर्वेचे आमदार रईस शेख यांचा समावेश असेल अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत केली.
आमदार रईस शेख यांनी विधानसभेत चर्चेदरम्यान भिवंडीला लॉजिस्टिक हब विकसित करण्याकडे सरकारचे लक्ष वेधले. भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्रासाठी आयएएस ऑफिसर नेमण्याची गरज आहे. ६० गावे आणि भिवंडी शहर मिळून १४४ स्केवर किलोमिटर क्षेत्र आहे जे मुंबईच्या ३० टक्के आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे सगळे अधिकार प्राधिकरणाकडे आहेत. ३००० कोटीच्या सरकारी जमिनीवर अतिक्रमण होत आहे ते वाचविण्याची गरज आहे. जर सरकार या विषयावर गंभीर झाले राज्य सरकारच्या १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा भिवंडीचा असेल, असे आमदार रईस शेख यांनी विधानसभेत सांगितले.
त्यावर उत्तर देताना, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आशिया खंडातला सगळ्यात मोठा लॉजिस्टिक हब भिवंडीत होऊ शकतो. परंतु तांत्रिक अडचणी जशा की आयएएस ऑफिसर नेमणे, एमएमआरडीएचे अधिकार परत घेणे याच्याशी सरकार सहमत आहे. म्हणून आमदार रईस शेख यांच्या विनंतीला मान देवून आपण एक कमिटी त्यात उद्योग, नगर विकास, यांच्यासह आपण चार पाच जणांची कमिटी गठित करू आणि त्याच धोरण निश्चित करून पुढे जाऊ, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले.
तत्पूर्वी बोलताना आमदार रईस शेख यांनी भिवंडीमध्ये इमारत पडून त्यात पाच वर्षीय बालकाचा मृत्यू तसेच तेथील अधिकाऱ्यांसंदर्भात अनधिकृत बांधकामाच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित केला. तेथील अधिकाऱ्याची चौकशी करून कडक कारवाई केली पाहिजे, अशी आग्रही मागणी केली.
त्यावर बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणात आपण उच्चस्तरीय समिती नेमून त्याची चौकशी केली जाईल आणि त्यात दोषी आढळल्यास नक्की कारवाई केली जाईल, असे सांगीतले. ML/ML/MS