रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू; 23 मे पर्यंत ऑरेंज अलर्ट…

रत्नागिरी दि २२:– रत्नागिरी जिल्ह्यात सर्व ठिकाणी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे अंतिम टप्प्यातील आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाकडून रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह आणि वादळीवाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 43.37 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. संगमेश्वर तालुक्यात सर्वाधिक 82.33 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि खेड तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे.