Operation Black Forest अंतर्गत ३१ नक्षलवाद्यांना कंठस्नान

नवी दिल्ली, दि. १५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 31 मार्च 2026 पर्यंत भारत नक्षलवाद्यांच्या प्रभावातून पूर्णपणे मुक्त करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवरील कर्रगुट्टलू डोंगरात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला असल्याची माहिती दिली आहे. नक्षलवादाविरुद्धच्या लढाईत मोठे यश मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. ही कारवाई ‘ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट’ अंतर्गत राबवण्यात आली असून, ती आतापर्यंतची सर्वात मोठी आणि निर्णायक कारवाई ठरली आहे.
“या कारवाईत एका जवानाचाही मृत्यू न झाल्याचा मला अभिमान आहे. देशभरातील जनतेला आपल्या सुरक्षाबलांचा अभिमान वाटतो,” असेही अमित शाह म्हणाले.
गृहमंत्र्यांनी X वर पोस्ट करत लिहिले की, “#नक्षलमुक्त भारत संकल्पात ऐतिहासिक यश – सुरक्षा दलांनी कर्रगुट्टलू डोंगरात 31 नक्षलवाद्यांना ठार करत लाल दहशतीच्या ठिकाणी तिरंगा फडकवला.” त्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), विशेष कृती दल (STF) आणि जिल्हा राखीव रक्षक (DRG) यांच्या शौर्याचे कौतुक करत, ही कारवाई 21 दिवसांत कोणतीही जीवितहानी न होता यशस्वी झाल्याचे सांगितले.
शाह म्हणाले, “ज्या डोंगरावर एकेकाळी लाल दहशत होती, तिथं आज तिरंगा अभिमानाने फडकतोय.” ही कारवाई केवळ सामरिक नव्हे, तर मानसिक विजयाचेही प्रतीक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सीआरपीएफचे महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, 31 मृतदेहांपैकी 28 जणांची ओळख पटली असून उर्वरितांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या कारवाईत कोब्रा युनिट, सीआरपीएफ आणि छत्तीसगड पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांचा समावेश होता. गुप्तचर अहवालानुसार, आणखी काही नक्षलवादी या मोहिमेत मारले गेले असण्याची शक्यता आहे.
कर्रगुट्टलू डोंगर हा नक्षलवाद्यांच्या अनेक संघटनांचे एकत्रित तळ मानला जात होता. यामध्ये पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी (PLGA), डीकेएसझेडसी, टीएससी आणि सीआरसी यांचा समावेश होता. हा डोंगर प्रशिक्षण, शस्त्रास्त्र निर्मिती आणि रणनीती आखणीचे मुख्य केंद्र म्हणून ओळखला जात होता.
(Operation Black Forest)