दलित आणि मराठा समाजाच्या एकजुटीने न्यायासाठी भव्य मोर्चाची घोषणा

मुंबई दि.20(एम एमसी न्यूज नेटवर्क) : परभणीतील आंबेडकरी कार्यकर्ते शहीद सोमनाथ सूर्यवंशी आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि न्याय मिळविण्यासाठी दलित आणि मराठा समाज एकत्र येऊन २५ जानेवारी २०२५ रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोर्चाची घोषणा रिपब्लिकन पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालय, इंसा हटमेंट आझाद मैदान, मुंबई येथे करण्यात आली. या वेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे व जिल्हा अध्यक्ष विवेक पवार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
अविनाश महातेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, “दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाने आयोजित केलेल्या या मोर्चाला रिपब्लिकन पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. दलित आणि मराठा समाजाच्या एकजुटीचे प्रतीक म्हणून हा मोर्चा ऐतिहासिक ठरेल.”
२५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान या मार्गावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये मराठा क्रांती मोर्चा आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या मोर्चाचे नेतृत्व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या आदेशानुसार करण्यात येणार आहे. हा मोर्चा दलित आणि मराठा समाजाच्या एकजुटीचे प्रतिक असून या अन्यायाला न्याय मिळवून देण्याच्या निर्धाराचा एक महत्वपूर्ण टप्पा ठरेल असे महातेकर म्हणाले.
SW/ML/SL
20 Jan. 2025