प्लास्टिकमुक्त मुंबईसाठी मनपा करणार कठोर कारवाई

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई प्लास्टिकमुक्त करण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. प्लास्टिकमुक्त मुंबईसाठी पुढील आठवड्यापासून धडक कारवाई करण्यात येणार आहे. त्याआधी मुंबईकरांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. मात्र त्यानंतरही मुंबईकरांच्या हातात प्लास्टिक पिशवी आढळल्यास थेट पाच हजारांचा दंड आकारण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.
२६ जुलै २००५ मध्ये मुंबईत आलेल्या महापुरास प्लास्टिक पिशवी कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यानंतर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशवी वापरावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर पालिका प्रशासनाकडून धडक कारवाई करण्यात आली. पालिकेच्या कारवाईनंतर मुंबईतून प्लास्टिक पिशवी हद्दपार झाली असे वाटत होते. मात्र मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि प्लास्टिक बंदी विरोधातील कारवाई थंडावली. मात्र आता पुन्हा एकदा मुंबई महापालिका प्रशासनाने प्लास्टिक पिशवी विक्री व वापरणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
अशी होणार कारवाई
पहिल्या गुन्ह्याला – ५,००० रुपये दंड
दुसऱ्या गुन्ह्याला – १०,००० रुपये दंड
तिसऱ्या गुन्ह्याला – २५,००० रुपये दंड
दंड भरला नाही तर कायदेशीर कारवाई
SL/ML/SL
13 Jan. 2025