‘कोण म्हणतं टक्का दिला?’ चे रंगभूमीवर पुनरागमन

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तीस वर्षांपूर्वी मराठी रंगभूमी गाजवणारे संजय पवार लिखित ‘कोण म्हणतं टक्का दिला?’ हे नाटक आता नवीन कलाकारांच्या संचात पुन्हा रंगभूमीवर दाखल होत आहे. अष्टपैलू अभिनेता उपेंद्र लिमये याने तेव्हांच्या नाटकात मुख्य भूमिका साकारली होती. आरक्षणाचा प्रश्न प्रखरपणे मांडणाऱ्या या नाटकाने तेव्हा मोठी लोकप्रियता मिळवली होती. नाटककार आणि पटकथा लेखक संजय पवार मंडल आयोगाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या ‘कोण म्हणतो टक्का दिला’? या नाटकाने नाट्यवर्तुळात आणि एकंदरीतच सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात मोठी उलथापालथ केली होती. आता पुन्हा एकदा आरक्षणावरुन राज्यात विविध समाजगटांमध्ये तेढ निर्माण झालेली असताना हे नाटक रंगमंचावर येणे हे धाडसाचे ठरणार आहे.
अनिकेत विश्वासराव, प्रिया मराठे, सुबोध पंडे, संयोगिता भावे, राहुल पेठे व पल्लवी वाघ-केळकर या कलावंतांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेले ‘कोण म्हणतं टक्का दिला?’ हे नाटक आता रंगभूमीवर येत आहे. या नाटकातल्या भूमिकेविषयी अनिकेत विश्वासराव म्हणाला, ‘‘माझ्या भूमिकेचा बोलण्याचा लहेजा गावरान आहे आणि त्याची सलगता कायम ठेवणे हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होते.’’
‘नवनीत प्रॉडक्शन’ निर्मित व ‘सुबोध पंडे प्रॉडक्शन्स’ प्रकाशित या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शुक्रवारी (ता. २२) गडकरी रंगायतन झाला. नाटकाचे लेखन संजय पवार यांनी केले असून, सुबोध पंडे हे दिग्दर्शक आहेत. शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना, संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य, अजित परब यांचे संगीत व मंगल केंकरे यांची वेशभूषा लाभली आहे. मृणालिनी पंडे, वैभव पाटील व अमोल परब हे या नाटकाचे सहनिर्माते आहेत. नितीन नाईक व दीपक जोशी हे या नाटकाचे सूत्रधार आहेत.
SL/ML/SL
23 March 2024