संत साहित्याचे विवेचक अभ्यासक डॉ. किशोर सानप कालवश

नागपूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): — महाराष्ट्राच्या साहित्य वर्तुळातील सिद्धहस्त लेखक व प्रसिद्ध समीक्षक डॉ किशोर सानप यांची दीर्घ आजाराने आज प्राणज्योत मालवली, ते ६७ वर्षाचे होते. नागपूरस्थित त्यांची कन्या डॉ. ऋचा यांच्या निरामय रूग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांनी मराठी साहित्यामध्ये अनेक मौलिक ग्रंथाची भर घातली. अनेक ग्रंथांचे समिक्षण केले. ते उत्तम लेखक, उत्तम परिक्षक व अभ्यासू वक्ते होते. गोंदिया येथे २०१२ ला झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच गुरुकुंज मोझरी येथे २०२३ ला झालेल्या १०व्या शेतकरी साहित्य संमेलनाचे सुध्दा ते अध्यक्ष होते.त्यांनी गो. से. वाणिज्य महाविद्यालय, वर्धा येथे अध्यापनाचे कार्य केले. ते विदर्भ साहित्य संघाचे पदाधिकारी होते. अनेक सामाजिक ,सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांमध्ये पदाधिकारी होते. लोक शिक्षण प्रसारक मंडळ वर्धा येथे कार्याध्यक्ष होते. असे बहुआयामी सव्यसाची व्यक्तिमत्त्व आज शरीराने आपल्याला सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेले.त्यांना पत्नी, दोन मुली, जावई , भावंडे व बराच मोठा आप्तपरिवार आहे. आज नागपूर अंत्यविधीस्थळी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
ML/KA/PGB 21 May 2023