आता हवेतील प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेचा टास्क फोर्स

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ): मुंबई शहरात मोठ्या प्रमाणावर होत असलेली विकासकामे, बांधकामे यासह हवेतील बदलामुळे हवेचा गुणवत्ता स्तर खालावत चालला आहे. प्रदूषणासाठी धूळ हाही एक घटक वारंवार कारणीभूत ठरला आहे. त्यामुळे हवेचे प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने धूळ नियंत्रण करण्यासाठी मुंबई महापालिकेने कृती दल अर्थात टास्क फोर्स नेमण्याचे ठरवले आहे . प्रत्येक विभागामध्ये तीन विषयांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे तीन टास्क फोर्स राहणार आहेत. धूळीच्या नियंत्रणासाठी मुंबई शहर व उपनगरात तातडीने व सक्त उपाययोजना अंमलात आणण्याचे तसेच या उपाययोजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर बांधकाम रोखण्यासह इतर कठोर कारवाई करण्यात येणार आहेत. हवा प्रदूषण व धूळ नियंत्रणाची प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्याच्या दृष्टीने सात सदस्यांची समिती देखील गठीत करण्यात आली होती. समितीने सुचवलेल्या उपायांनुसार विभागीय स्तरावर कृती दल अर्थात टास्क फोर्स नेमण्याचे ठरले होते काही विभागांमध्ये टास्क फोर्सच्या नेमणुकांना सुरूवात होऊन त्यांच्यामार्फत प्रत्यक्ष भेटींनाही सुरूवात झाली आहे. इमारत बांधकामाच्या ठिकाणी हवेत उडणाऱ्या धुलिकणांच्या नियंत्रणासाठी ही टास्कफोर्स काम करणार आहे. मुंबईत सुरू असलेल्या रस्ते आणि पूल बांधणीच्या कामाच्या ठिकाणी टास्क फोर्स ही प्रत्यक्ष भेटीच्या माध्यमातून, प्रकल्प स्थळी नियमितपणे धूळ नियंत्रणाची खबरदारी घेण्यात आली आहे की नाही, हे बघणार आहे यामध्ये मुंबई महापालिका आणि विविध यंत्रणांच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या कामांचाही यामध्ये समावेश असणार आहे.नियमितपणे बांधकाम किंवा प्रकल्पाच्या ठिकाणी भेटी देवून तेथे धूळ नियंत्रणासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, उपाययोजनांमध्ये वापरात आलेले तंत्रज्ञान किंवा पद्धतीचाही टास्क फोर्सकडून आढावा घेण्यात येणार आहे.मुंबईतील रस्त्यांची दैनंदिन झाडलोट व स्वच्छता करतानाही स्वाभाविकच धूळ उडते. या कामांमध्ये नेहमी धूळ आढळणारे रस्ते, नियमितपणे स्वच्छ करण्यात येणारे रस्ते, रस्त्यांवर धूळ नियंत्रणासाठीच्या उपाययोजना आणि पाण्याची फवारणी करणे, रस्ते स्वच्छतेच्या विशेष मोहीमा या बाबींवर टास्क फोर्स देखरेख ठेवणार आहे. उघड्यावर जाळण्यात येणारा कचरा व इतर टाकाऊ वस्तू / पदार्थांची ठिकाणे, खुल्यावर जाळण्याची कारणे यांचाही टास्क फोर्सकडून शोध घेतला जाणार आहे. रस्त्यांची किंवा पुलाची कामे सुरू असलेल्या ठिकाणी नियमितपणे धूळ नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे की नाही, याची पडताळणी सदर टास्क फोर्स करणार आहे. मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबा, बेकरी, उपहारगृहं, रस्त्यांवरील स्टॉल यासारख्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे इंधन वापरात येते, याची देखरेख टास्क फोर्स करणार आहे. याठिकाणी अस्वच्छ इंधनाचा वापर होतो आहे का ? याचीही पडताळणी टास्क फोर्स करेल. या टास्क फोर्समध्ये अस्वच्छ इंधनाचा वापर करून धूळीमध्ये भर घालणाऱ्या ठिकाणी या टास्क फोर्सकडून प्रत्यक्ष भेटी देण्यात येतील. टास्क फोर्सच्या सदस्यांना विभागीय पातळीवर प्रत्यक्ष भेटीद्वारे निरीक्षणे नोंदवून अहवाल तयार करायचा आहे. हा अहवाल ते प्रत्येक आठवड्याला विभागीय सहायक आयुक्तांना सादर करतील. धूळ नियंत्रण, पर्यावरणाशी संबंधित बाबींची अंमलबजावणी न करणाऱ्या प्रकल्पाच्या ठिकाणी समज देणारी नोटीस पहिल्यांदा बजावण्यात येईल. पहिल्या नोटीशीनंतरही नियमांची अंमलबजावणी न केल्यास त्या प्रकल्पांच्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्यासोबतच कारवाईचा अहवालदेखील सहायक आयुक्त कार्यालयाला सादर करावयाचा आहे. ज्याठिकाणी उपाययोजनांचे उल्लंघन दिसेल अशा ठिकाणी कंत्राटदार किंवा जबाबदार संस्था यांच्यावर संबंधित विभागांमार्फत दंडात्मक कारवाई करुन घेण्याची कार्यवाही देखील टास्क फोर्सने पार पाडावयाची आहे. प्रकल्पाचे काम सुरू असणाऱ्या ठिकाणी कंत्राटदाराला हवा प्रदूषण होत नसल्याचे स्वयं- प्रमाणिकरण घोषणापत्र द्यावे लागणार आहे.
ML/KA/PGB 25 APR 2023