मुंबई,दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय रिझर्व्ह बॅंकेने आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या अखेरच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत रेपो दरात ०.२५ टक्क्यांची वाढ केली आहे. नव्या वाढीसह आता रेपो रेट ६.५० टक्के इतका झाला आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही माहिती दिली.
सर्वसामान्यावर काय होणार परिणाम
रेपो दरात वाढ केल्याने सर्वसामान्यांना गृहकर्जापासून सर्व कर्जे पुन्हा महाग मिळतील. त्यांचा ईएमआयचा हप्ता वाढणार आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) हे पाऊलं उचलले आहे. परंतु त्याचा फटका कर्ज घेणाऱ्या सर्व जनतेलाच बसणार आहे.
रेपो रेट म्हणजे काय?
रेपो रेट हा दर आहे ज्यावर आरबीआय बँकांना कर्ज देते, तर रिव्हर्स रेपो रेट हा दर आहे ज्यावर आरबीआय पैसे ठेवण्यासाठी बँकांना व्याज देते. रेपो रेट कमी झाल्यामुळे कर्जाचा ईएमआय कमी होतो, तर रेपो रेट वाढल्याने सर्व प्रकारची कर्जे महाग होतात आणि या क्रमाने ईएमआयमध्येही वाढ होते.
आरबीआयद्वारे वाढवण्यात आलेला रेपो रेटमुळे थेट बँकेच्या कर्जावर परिणाम होतो. जेव्हा रेपो रेट कमी होतो, तेव्हा कर्ज स्वस्त होतं आणि ज्यावेळी रेपो रेट वाढतो, त्यावेळी बँका देखील त्यांचं कर्ज महाग करतात. त्याचा परिणाम होम लोन (Home Loan), ऑटो लोन (Auto Loan), पर्सनल लोन (Personel Loan) अशा सर्व प्रकारच्या कर्जांवर होतो.