सोयाबीनला उत्तम पर्याय म्हणून सूर्यफुलाची लागवड !
वाशिम, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): साधारणतः २० वर्षापूर्वी वाशीम जिल्ह्यात रब्बी हंगामात सूर्यफूल या तेलवर्गीय पिकाची लागवड केली जायची मात्र सोयाबिन आणि पक्ष्यांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांनी दरम्यानच्या काळात सूर्यफूल पिकाची पेरणी टाळली होती.
सद्यस्थितीत तेलांच्या वाढलेल्या किमती व जमीनीचा पोत राखण्यासाठी पिकांमधील फेरबदलाचे महत्व लक्षात घेता वाशीम जिल्हयातील शेतकरी पुन्हा एकदा सूर्यफूल या तेलवर्गीय पिकाच्या लागवडीकडे वळले आहेत.
यंदा रब्बी हंगामामध्ये वाशीम जिल्ह्यात तब्बल २५ हेक्टर क्षेत्रावर सूर्यफुलाची लागवड करण्यात आली असून गत २० वर्षांच्या तुलनेत यंदा प्रथमच शेतकरी मोठया प्रमाणात या दुर्मिळ झालेल्या पिकांकडे वळले आहेत. त्यामुळे आकर्षक पिवळया फुलांनी वाशीम जिल्ह्यातील शेतशिवार बहरला आहे.
तेलबियांचे उत्पादन वाढविण्यासाठी शासन स्तरावर कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. सोयाबीन हे खरीप हंगामातील प्रमुख पिक असलेल्या वाशीम जिल्हयात काही वर्षांपूर्वी करडई, मोहरी आणि सूर्यफुलाची शेती मोठया प्रमाणात केली जायची.
मात्र सोयाबिनच्या आगमनामुळे जिल्हयातील शेतकरी सोयाबिन पिकांकडे वळले होते.Cultivation of sunflower as a better alternative to soybeans!
सिंचनाच्या सोयीमुळे खरीप आणि रब्बीबरोबरच उन्हाळी हंगामातही सोयाबीनचा पेरा व्हायचा. मात्र जमीनीच्या सुपीकतेसाठी सलग एक पीक घेणे घातक असल्याने जिल्हयातील शेतकऱ्यांनी सोयाबीनला पर्याय शोधत यावर्षी सूर्यफुलाची पेरणी केली आहे.
सूर्यफुलाचे तेल हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याने बाजार भावही चांगला मिळतो. दरम्यान, आगामी काळात सूर्यफुलाचे क्षेत्र वाढल्यास शेतकऱ्यांना आर्थिक लाभाबरोबरच जमिनीचीही सुपिकता वाढेल त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात सूर्यफुलाची लागवड करावी असे आवाहन कृषी पर्यवेक्षक राजेश राठोड यांनी केले आहे.
ML/KA/PGB
12 Jan. 2023