सिद्धिविनायकाच्या आशीर्वादाने ‘गणा धाव रे’च्या चित्रीकरणाला शुभारंभ

 सिद्धिविनायकाच्या आशीर्वादाने ‘गणा धाव रे’च्या चित्रीकरणाला शुभारंभ

मुंबई, दि २०
मराठी चित्रपटसृष्टीत आशयघन कथा, सांस्कृतिक भान आणि भावनांचा हळुवार स्पर्श यांचा प्रभावी संगम घडवणारे दिग्दर्शक केदार शिंदे आता प्रेक्षकांसाठी एक वेगळाच अध्यात्मिक आणि भावविश्वाला स्पर्श करणारा सिनेमॅटिक अनुभव घेऊन येत आहेत. ‘बी-लाईव्ह प्रॉडक्शन्स’ प्रस्तुत ‘गणा धाव रे’ हा आगामी मराठी चित्रपट श्रद्धा, माणुसकी, परंपरा आणि भक्तीभाव यांच्या गाभ्याशी जोडलेली एक भावस्पर्शी कथा घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माता सूरज सिंग, वर्षा कुकरेजा, नूतन जैन , चैतन्य राणे आणि रिचर्ड पीटर्स यांच्या नेतृत्वाखाली साकारत असलेल्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ नुकताच अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

चित्रपटाच्या शुभारंभानिमित्त संपूर्ण टीमने मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर येथे जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन घेतले आणि चित्रपटाच्या यशस्वी प्रवासासाठी प्रार्थना केली. बाप्पांच्या चरणी नतमस्तक होत ‘गणा धाव रे’च्या चित्रीकरणाला अधिकृत सुरुवात करण्यात आली. श्रद्धा आणि भक्ती या भावनेशी घट्ट नाळ जुळलेल्या या चित्रपटाची सुरुवातही बाप्पांच्या आशीर्वादाने झाल्याने संपूर्ण टीमसाठी हा क्षण अत्यंत भावनिक, समाधानकारक आणि प्रेरणादायी ठरला. यावेळी दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासह अभिनेत्री प्रणाली घोगरे तसेच अभिनेते आशुतोष गायकवाड आणि ओंकार पाटील उपस्थित होते.

कोकणाच्या निसर्गरम्य, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक पार्श्वभूमीवर उलगडणारा ‘गणा धाव रे’ हा चित्रपट एका सामान्य माणसाच्या असामान्य श्रद्धेचा प्रवास मांडणारा आहे. गणपती बाप्पांवरील नितांत विश्वास, गावकुसातील परंपरा, सण-उत्सवांची सांस्कृतिक उधळण आणि सामूहिक भावविश्व यांच्या माध्यमातून ही कथा अधिक जिवंत आणि प्रभावी बनते. श्रद्धा माणसाला संकटांशी सामना करण्याची ताकद कशी देते, भावनांना आधार कसा देते आणि जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी कशी निर्माण करते, याचा हृदयस्पर्शी वेध या चित्रपटातून घेण्यात आला आहे.

कल्पनारंजन आणि वास्तव यांचा सुरेख समतोल साधणाऱ्या या कथेमध्ये भक्त आणि दैवत यांच्यातील अदृश्य, पण भावनिक नात्याचा सूक्ष्म शोध घेण्यात आला आहे. कोकणातील ग्रामसंस्कृती, पारंपरिक जीवनपद्धती, लोकविश्वास आणि स्थानिक भावविश्व यांचे वास्तवदर्शी चित्रण चित्रपटाला अधिक समृद्ध आणि अस्सल बनवते. त्यामुळे ‘गणा धाव रे’ हा केवळ मनोरंजन करणारा चित्रपट न ठरता, प्रेक्षकांच्या मनात श्रद्धा, माणुसकी आणि भावनांचे नवे पदर उलगडणारा अनुभव ठरणार आहे.

चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, “हा विषय माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. ही फक्त एक कथा नाही, तर श्रद्धा, विश्वास आणि भावविश्वाशी जोडलेला एक अंतर्मुख करणारा प्रवास आहे. अनेकदा आपण कथा निवडतो, पण या वेळी या कथेनेच मला निवडले. या कथेमधील अध्यात्मिक आणि मानवी भावनांचा प्रवाह प्रेक्षकांच्या मनापर्यंत निश्चित पोहोचेल, असा मला विश्वास आहे.”

दर्जेदार आशय, भावनिक गाभा, दमदार कलाकारांची फळी आणि सांस्कृतिक समृद्धी यांमुळे ‘गणा धाव रे’ हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत वेगळी छाप निर्माण करणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. श्रद्धा, माणुसकी आणि भक्तीभाव यांचे अतूट नाते अधोरेखित करणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक भावनिक, अध्यात्मिक आणि मनाला भिडणारा सिनेमॅटिक प्रवास ठरणार आहे.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *