मुंबईतील वांद्रे येथे बेकायदेशीर अतिक्रमणावर आणि झोपड्यांवर बुलडोझरने झाली कारवाई
मुंबई, दि १९
मुंबईतील वांद्रे (पूर्व) रेल्वे स्थानक परिसरातील गरीब नगर भागात पश्चिम रेल्वेने बेकायदेशीर अतिक्रमणांवर आणि अनधिकृत झोपड्यांवर मोठी बुलडोझर कारवाई सुरू केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही धडक मोहीम हाती घेण्यात आली असून, यामुळे परिसरात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर पश्चिम रेल्वेने ही प्रलंबित कारवाई सुरू केली आहे. वांद्रे टर्मिनसच्या विस्तारकामासाठी रेल्वे रुळांलगतची ही रेल्वेची जागा मोकळी करणे आवश्यक होते.

२०१७ सालापासून ही कायदेशीर प्रक्रिया आणि कारवाई प्रलंबित होती, जी अखेर प्रत्यक्ष अमलात आणली जात आहे. गरीब नगर भागातील सुमारे ५०० अनधिकृत घरे आणि झोपड्यांवर रेल्वेने बुलडोझर चालवून त्या जमीनदोस्त केल्या आहेत.रेल्वे प्रशासनाची ही अतिक्रमण हटाव मोहीम १९ मे ते २३ मे २०२६ या कालावधीत राबवली जाणार आहे.स्थानिक रहिवासी आणि काही राजकीय कार्यकर्त्यांकडून या कारवाईला जोरदार विरोध करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.२०२१ च्या सर्वेक्षणानुसार जे रहिवासी पुनर्वसनासाठी पात्र ठरले आहेत, त्यांच्या अधिकृत संरचनांना धक्का लावला जाणार नाही, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.KK/ML/MS