जमिनीच्या वादातून भावाने सुपारी देऊन केली भावाची हत्या
भिवंडी, दि १८
ठाणे ग्रामीण पोलिसांनी गणेशपुरी हत्याकांडाचा पर्दाफाश करून चार आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक खुलासा हा आहे की, मृताच्या स्वातःचे भावाने त्याची हत्या करण्यासाठी १० लाख रुपयांची सुपारी दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, १२ मे रोजी, भिवंडी तालुक्यातील शेडगाव येथील रहिवासी परेश पाटील (४०) हे आपल्या मोटरसायकलवरून वसईला कामावर जात होते. वाशिंद-अंबाडी रस्त्यावरील शेडगाव फाट्याजवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. डोक्यावर जबर प्रहार झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली. मृताचा भाऊ, नरेश पाटील यांनी गणेशपुरी पोलीस ठाण्यात हत्येची तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल झालते यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशीचे आदेश दिले. गणेशपुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गिट्टे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कदम, रोहन शेलार, भाऊसाहेब गायकवाड, शरद सुराळकर, उमेश खिरद, मयूर शेवाळे आणि निरंजन पाटील यांचा समावेश असलेल्या पथकाने तपास सुरू केला.
गणेशपुरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुमारे २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला. पोलिसांनी मृताचे भाऊ, राकेश पाटील (३७), प्रेमजीत घरात (३८) आणि दक्षत भोईर (२४) यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. त्यांनी हत्येची कबुली दिली. तपासात असे उघड झाले की, मृताचा भाऊ, फिर्यादी नरेश पाटील हा या संपूर्ण कटाचा सूत्रधार होता. जमीन आणि घर भावाच्या नावावर असल्याने संतप्त झालेल्या नरेशने, हत्येसाठी पालघरच्या केळवा भागातील गुन्हेगारांना १० लाख रुपये सुपारी दिली होती. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.
मयत परेश आणि आरोपी नरेश हे सख्ख्या भाऊ होते. थोरला भाऊ परेशने त्यांची सामायिक शेतजमीन आणि घर स्वतःच्या नावावर हस्तांतरित केले होते. यामुळे संतापलेल्या धाकट्या भाऊ नरेशने, आपल्याच भावाची हत्या करण्यासाठी पालघरच्या केळवा भागातील गुन्हेगारांना १० लाख रुपयांचे सुपारी दिली असल्याचे उघडकीस आले.KK/ML/MS