‘ॲग्रीकॉस २०२५’ दिवाळी अंकाचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते प्रकाशन

 ‘ॲग्रीकॉस २०२५’ दिवाळी अंकाचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते प्रकाशन

पुणे, दि. 13 : “महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कृषी पदवीधरांनी फार मोठी उंची गाठली आहे. अनेक उद्योजक, राजकारणी, बांधकाम व्यावसायिक, प्रशासकीय अधिकारी, शास्त्रज्ञ कृषी पदवीधर आहेत. कृषी पदवीधरांनी केवळ शासकीय नोकरी न पकडता उत्तम शेती करून व शास्त्रीय पद्धतीने शेती करून स्वतः उदाहरण निर्माण करणे गरजेचं आहे. शेती हा केवळ व्यवसाय नाही, तर आपल्या संस्कृतीचा श्वास आहे. तो श्वास जिवंत ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे कृषी पदवीधरांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.” अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

राज्यातील कृषी क्षेत्राशी निगडीत संशोधन, नवकल्पना आणि शेतीत आधुनिकतेचा प्रसार करण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या ॲग्रीकॉस मासिकाच्या ‘ॲग्रीकॉस दिवाळी अंक २०२५’ चे प्रकाशन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते आज पुण्यात पार पडला. हा प्रकाशन सोहळा पीडीसीसी बँकेच्या मुख्य कार्यालयात, ४ बिंग रोड, पुणे येथे पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन शेखर गायकवाड व ॲग्रीकॉस दिवाळी अंक संपादक मंडळ, माजी विद्यार्थी संघटना कृषी महाविद्यालय, पुणे, आणि स्टेट ॲग्रीकॉस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. ॲग्रीकॉस दिवाळी अंक २०२५ हा “ॲग्रीकॉस आणि विनोद” या विषयावर आधारित असून, शेती, ग्रामीण जीवन, नवकल्पना आणि विनोदी लेखन यांचा समतोल साधणारा अंक आहे.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “अतिवृष्टीमुळं नुकसान झाल्यानं आज राज्यभरातील माझा शेतकरी खचला आहे. त्याला पुन्हा उभं राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी नुकतंच एकतीश हजार सहाशे कोटी रुपयाचं शेतक-यांना मदतीसाठी विशेष पॅकेज जाहीर केलं आहे. पुढंही महाराष्ट्र शासन, कृषी विभाग शेतक-यांच्या सोबतीला असंल. त्यासाठी कृषी विभाग नवनव्या योजना राबवत आहे, तसंच कृषी विभागाच्या जवळपास ५० हून अधिक महत्वपुर्ण योजना आहेत, त्याचा ही शेक-यांना लाभ मिळणार आहे. येत्या काळामध्ये आपल्याला शेतीची दिशा बदलावी लागेल काय? असं सांगणारा हा काळ आहे. अशावेळी कृषी पदवीधरांनी केवळ शासकीय नोकरी न पकडता उत्तम शेती करून व शास्त्रीय पद्धतीने शेती करून स्वतः उदाहरण निर्माण करणे गरजेचं आहे.”

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषि पदवीधरांच्या संघटन शक्तीवर ही भाष्य केलं. ते म्हणाले, “या दिवाळी अंकाच्या निमित्ताने शेखर गायकवाड आणि त्यांचे सहकारी यांनी राज्यातील कृषि पदवीधरांना एकत्र आणून त्यांच्या संघटन शक्तीचा वापर सकारात्मक रित्या करायचं ठरवल्याचं दिसून येतंय. कृषी पदवीधरांची पहिली राज्य पातळीवरील कृषी पदवीधर पतसंस्था स्टेट ॲग्रीकॉस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या नावानं उभारण्यात आली आहे. येत्या काळामध्ये ही संस्था शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्जापासून अन्य वित्तीय गरजा भागवण्यामध्ये सुद्धा निश्चितपणे योगदान देईल. नुकताच शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला आहे. कृषि विभाग देखील कृषी शिक्षणाच्या बाबतीत असाच निर्णय घेईल. पुणे कृषी महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेला दिलेल्या जागेबद्दल देखील माझ्याकडे संघटनेने मुद्दा लक्षात आणून दिला आहे.”

यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुगाडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, ॲग्रीकॉस दिवाळी अंक संपादक मंडळाचे सदस्य, विद्यार्थी, कृषी विद्यापीठांचे प्रतिनिधी तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित विविध मान्यवर उपस्थित होते.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *