विरोधकांचा परंपरेनुसार चहापान बहिष्कार सुरूच
नागपूर दि ६– राज्यातील अवकाळी पाऊस आणि दुष्काळ यातून होरपळलेल्या शेतकऱ्यांना यावर्षीच्या पीक कर्जाची माफी सरकारने जाहीर करावी अशी मागणी करीत उद्यापासून नागपुरात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यानी बोलावलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. याआधी विरोधी पक्षनेत्यांची एकत्रित बैठक झाली, त्यात विरोधी पक्षाच्या भूमिकेवर चर्चा करून निर्णय घेण्यात आला.
राज्यात दंगली, कायदा सुव्यवस्था, दुष्काळ , अवकाळी कडे सरकारचे होणारे दुर्लक्ष , राज्यात शांतता नसल्याने आर्थिक गुंतवणूक कशी येणार असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केला. दुष्काळाकडे बघण्याचा सरकारचा दृष्टिकोन नकारात्मक आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत न देता स्वतः शासन आपल्या दारी कार्यक्रमावर अमाप उधळपट्टी केली जाते आहे. अवकाळी पावसाने चार लाख हेक्टरहून अधिक शेती बाधित झाली आहे त्यामुळे चालू हंगामाच्या शेती कर्जाची माफी सरकारने जाहीर करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
राज्यात औषध खरेदी होत नाही , सार्वजनिक रुग्णालयात होणारे मृत्यू विदारक आहे. आरोग्य खात्यात प्रचंड भ्रष्टाचार आहे, राज्यात ड्रग्ज चा व्यापार जोरात सुरु आहे. सरकारी खर्चाने सरकार स्वतःचा राजकीय प्रचार करून घेत आहे असे आरोप विधान परिषदेचे पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी केली.