बिहारसाठी काँग्रेसचं ठरलं !

नवी दिल्ली, दि. २9 : बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची रणनीती काँग्रेसने निश्चित केली. इंडिया आघाडीचा घटक म्हणून त्या राज्यात लढणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले. तसेच, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवण्याचा निर्णय आघाडीचे घटक पक्ष एकत्रित मिळून घेतील, असेही नमूद केले.
एनडीएची सत्ता असणाऱ्या बिहारमध्ये चालू वर्षीच्या अखेरीस निवडणूक होईल. त्यासाठी आता काही महिन्यांचाच अवधी उरला आहे. त्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिल्लीत पक्षाच्या बिहारमधील नेत्यांची बैठक घेतली. त्यावेळी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, बिहार प्रदेशाध्यक्ष राजेश कुमार, प्रभारी कृष्णा अल्लवरू आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते. त्या बैठकीमुळे काँग्रेस मित्रपक्षांना साथीला घेऊनच निवडणुकीत एनडीएशी दोन हात करणार असल्याच्या बाबीवर शिक्कामोर्तब झाले. सध्या बिहारमध्ये काँग्रेस, राजद, डावे पक्ष मित्रपक्षांच्या भूमिकेत आहेत.
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष बिहारच्या राजकीय रणसंग्रामासाठी सज्ज झाला आहे. त्याकडे लक्ष वेधून पत्रकारांनी काँग्रेसच्या बैठकीनंतर अल्लवरू यांना किशोर यांच्याशी हातमिळवणी होणार का, अशा आशयाचा प्रश्न विचारला. भाजपच्या विरोधात किशोर सक्रिय असल्याचे तुम्ही म्हणता. त्यांच्या विषयी इंडियाचे घटक पक्ष चर्चा करून निर्णय घेतील, असे उत्तर अल्लवरू यांनी दिले.