देशात पहिल्यांदाच मोबाईल अॅपद्वारे मतदान

भारताने निवडणूक प्रक्रियेत एक ऐतिहासिक पाऊल उचलत पहिल्यांदाच मोबाईल अॅपद्वारे मतदानाची संधी उपलब्ध करून दिली आहे. बिहार राज्यातील २६ जिल्ह्यांमधील ४२ नगरपालिकांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये या नव्या प्रणालीचा वापर करण्यात आला. या पायलट प्रोजेक्टमध्ये सहा नगरपालिकांमध्ये ई-व्होटिंग अॅपच्या माध्यमातून मतदारांनी आपला हक्क बजावला. या उपक्रमासाठी “ई-वोटिंग SECBHR” नावाचं अॅप C-DAC आणि बिहार राज्य निवडणूक आयोगाने संयुक्तपणे विकसित केलं आहे. या अॅपमध्ये फेस रिकग्निशन, लाईव्ह फेस स्कॅन, ब्लॉकचेन तंत्रज्ञान यांसारख्या अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश आहे, ज्यामुळे मतदान प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि पारदर्शक झाली आहे. या प्रयोगामुळे भारतात निवडणूक प्रक्रियेच्या डिजिटल परिवर्तनाला चालना मिळाली असून, भविष्यात देशभरात ही प्रणाली लागू करण्याचा विचार केला जाऊ शकतो.
विशेष म्हणजे, दुबई, कतारसारख्या देशांमध्ये राहणाऱ्या स्थलांतरित बिहारी नागरिकांनीही या अॅपद्वारे मतदानात सहभाग घेतला. मोतिहारी येथील विभा या देशातील पहिल्या ई-मतदार ठरल्या, ज्यांनी अॅपद्वारे मतदान करून इतिहास रचला. या प्रणालीचा उद्देश म्हणजे मतदान केंद्रांवर पोहोचू न शकणाऱ्या नागरिकांना – जसे की स्थलांतरित कामगार, दिव्यांग, वृद्ध, गर्भवती महिला आणि गंभीर आजारी व्यक्ती – यांना घरबसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध करून देणं. सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत झालेल्या ई-मतदानात ८०% पेक्षा जास्त मतदारांनी सहभाग घेतला, तर उर्वरितांनी पारंपरिक पद्धतीने मतदान केलं.