*बंद पडलेल्या मराठी शाळेत झाली कापडाची शोरुम!

मुंबई प्रतिनिधी: मध्य मुंबईतील परळ येथील नायगावसारख्या मराठी बहुल भागातील नामांकित सरस्वती प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद पडली असून महापालिकेच्या जागेवरील या शाळेचा व्यावसायिक वापर होत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. शाळेच्या तळमजल्यावर गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर साड्यांची दुकाने सुरू झाली असून शाळेच्या वरच्या मजल्यावर मुख्याध्यापक वास्तव्य करीत आहेत. शाळेसाठी दिलेल्या सरकारी जमिनीचा व्यावसायिक वापर होत असल्याचा आरोप तेथील रहिवाशांनी केला आहे.
नायगाव हिंदमाता परिसरातील गवाणकर चौक येथील सरस्वती प्राथमिक आणि माध्यमिक ही सुमारे शंभर वर्षांहून जुनी शाळा २०१५ पासून बंद झाली आहे. आधी लालबाग येथे एका छोट्या चाळीत असलेली ही शाळा १९८५ पासून नायगावमधील एका इमारतीत स्थलांतरित करण्यात आली. गेली कित्येक दशके या शाळेने विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडवल्या. मात्र ही शाळा आता बंद पडली असून त्याचा व्यावसायिक वापर सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या परिसरातील स्थानिक रहिवासी आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे मुख्य सहप्रवक्ते, उपनेता राजेंद्र वाघमारे यांनी सांगितले, या जमिनीवर पूर्वी काहीच नव्हते. फक्त एक झोपडपट्टी होती. शाळेचा एफएसआय घेऊन ही इमारत बांधण्यात आली. या शाळेचा आता व्यावसायिक वापर होत आहे. शैक्षणिक उपक्रमासाठी आम्ही काही वर्ग मागितले होते. मात्र त्यासाठी हे वर्ग दिले जात नाहीत. आता शैक्षणिक वापर बाजूलाच राहिला आहे. बार्टीचे क्लासेस सुरू करण्यासाठीही आम्ही वर्ग मागितले होते. मात्र संस्थेचे लोक पुढे येत नाहीत, असेही ते म्हणाले.
धर्मादाय आयुक्तालयाकडेही नोंदी नाहीत
धर्मादाय आयुक्तांकडे या शाळेची नोंदणी लालबाग येथील जुन्या पत्त्याची आहे. मात्र दरवर्षी हिशेब देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया केलेली दिसत नाही. शाळेच्या नायगाव येथील पत्त्याची नोंद धर्मादाय आयुक्तांकडे केलेली नाही. शाळा उभी राहण्यापूर्वी तेथे दुकाने नव्हती. शाळा उभी राहिल्यानंतर ही दुकाने आली आणि त्यानंतर गेल्या काही वर्षात त्यात वाढ झाली आहे. त्याची नोंद धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे का असा प्रश्न वाघमारे यांनी उपस्थित केला आहे.
महापालिकेच्या भूखंडावर खासगी शाळा
याबाबत मुंबई महापालिकेच्या विकास नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही जागा महापालिकेची असून या भूखंडावर खासगी शाळेचे आरक्षण आहे. शाळा रस्त्याला लागून असेल आणि शाळेला वेगळा प्रवेशमार्ग असेल तर आधीच्या विकास आराखड्यानुसार शाळेच्या इमारतीच्या खालच्या भागात दुकानांना परवानगी होती. मात्र त्यांनी आराखडा मंजूर करताना याबाबी मंजूर केल्या होत्या का हे तपासावे लागेल. शिक्षणाशी संबंधित उपक्रम या शाळेत करता येऊ शकतात. पण तेथे कोणी राहू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.
मुख्याध्यापकांनी आरोप फेटाळले
शाळेचे माजी मुख्याध्यापक शशीभूषण गव्हाणकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ही शाळा माझे वडील शांताराम यशवंत गव्हाणकर यांनी १९८६ मध्ये बांधली. निवासी भूखंडावर ही शाळा बांधली असल्याचे गव्हाणकर यांचे म्हणणे आहे. तसेच शाळेच्या तळमजल्यावरील दुकाने ही १९८६ पासूनच आहेत. विद्यार्थी कमी झाल्यामुळे शाळा बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. KK/ML/MS