न्यू हनूमान थिएटरमध्ये रंगणार शाहिरी लोकरंग!*

मुंबई, दि 5
येत्या ९ जून रोजी लोककलेचे प्रेरणास्थान मधूशेठ नेराळे यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने संध्याकाळी ५ वाजता न्यू हनुमान थिएटर,लालबाग येथे शाहिरी लोक कला मंच आणि नेराळे परिवाराच्या संयुक्त विद्यमाने “भव्य शाहिरी मेळावा” पार पडत आहे.
या प्रसंगी दिवंगत मधुशेठ नेराळे शेवटच्या श्वासापर्यंत तमाशा, शाहिरी लोक कलाकारांच्या हक्कासाठी लढत राहिले,त्यांचे पुण्यस्मरण या प्रसंगी करण्यात येईल.त्याच प्रमाणे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात,संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आणि गिरणी कामगारांच्या लढ्यात शाहिरी लोककला तळपत्या तलवारी प्रमाणे तळपत राहिली आहे,या लोककलेचा पुन्हा नव्याने गिरणगावात जागर होणार आहे,हे विशेष आहे.
मेळाव्यात शाहीर आत्माराम पाटील,आण्णाभाऊ साठे,शाहीर अमरशेख,शाहीर साबळे, राजाभाऊ खामकर,विठ्ठल उमप आदी शाहिरांच्या अजरामर रचनांना उजाळा देण्यात येणार आहे.”जय जय महाराष्ट्र”, “झुंज मुंज पहाट झाली” “,मिसळ झाली..!” अशा एका पेक्षा एक शाहिरी लोकगीता बरोबरच,”या कोली वाऱ्याची शान”, “देवाची किरपा आम्हावर”, यासारख्या कोळीगीतांचा नजराना पेश करण्यात येणार आहे.शाहिरी लोक कलेमध्ये पोवाडा आणि लावणीने आपला वेगळाच ठसा उमटविला आहे.दिवंगत ज्येष्ठ,श्रेष्ठ गायिका सुलोचना यांनी जवळपास तीन पिढ्यावर आपल्या बहारदार लावणीचं अधिराज्य गाजवलं आहे. रसिकांच्या ओठावर कायम तरळून असलेल्या आणि त्यांच्याच कंठातून आजरामर झालेल्या, “तुझ्या उसाला लागेल कोल्हा!” हे गणे कार्यक्रमात सादर करण्यात येऊन दिवंगत ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना यांच्या स्मृतींना वंदन करण्यात येईल.”गाडी आणावी बुरख्याची!” सारख्या काही पारंपरिक लावण्या आणि पोवाडे सादर करण्यात येऊन,काळाआड जाऊ पाहणाऱ्या लावणी आणि पोवाडा या दोन्ही कलांना पुन्हा रसिकांच्या हृदयात स्थान निर्माण करुन देण्याचा प्रयत्न होणार आहे.संस्थेचे सरचिटणीस शाहीर मधु खामकर यांची संकल्पना असून त्यांच्याच दिग्दर्शनाखाली अध्यक्ष शाहीर शांताराम चव्हाण, उपाध्यक्ष दत्ता ठुले, कमलाकर पाटील, अविरत साळवी, निलेश जाधव,गीता गोलांबरे,लता देवरुखकर,धीरज पारकर आदी गायक आपल्या सुमधूर आवाजातून गाणी सादर करणार आहेत.चित्रपट आणि मालिकांसाठी संगीतकार म्हणून गाजत असलेले मनोहर गोलांबरे यांनी या कार्यक्रमाचे संगीत संयोजन केले आहे.प्रसिध्द वादक अशोक वायंगणकर,ज्ञानेश ढोरे (ढोलकी),डॉ. खुशाले यांचे विशेष संगीत सहाय्य लाभले आहे.नृत्य दिग्दर्शन श्री. गणेश कारंडे करून नृत्याविष्कारातून कार्यक्रमात नवा साज चढवणार आहेत.त्यांना सुरेखा काटकर,माणिक मयेकर,तेजस्विनी वाडेकर ,माधुरी पारकर या कलावंताची साथ लाभली आहे.
गिरणगावातील हा शाहिरी लोकोस्तव,न भूतो न भविष्यती ठरावा, यासाठी संस्थेचे सरचिटणीस शाहिर मधु खामकर,समन्वयक कथालेखक काशिनाथ माटल,खजिनदार संगीतकार महादेव खैरमोडे,हेमराज नेराळे जिवापाड मेहनत घेत आहेत.
स्वरीता पाटकर,शर्वरी पवार,अरुण थोरात, सुधीर साळवी, रविंद्रनाथ पारकर आदी कलावंताचेही याकामी मोलाचे सहकार्य लाभत आहे.कार्यक्रम विनामूल्य आहे,असे संयोजकांनी म्हटले आहे.