“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” उत्साहात संपन्न!

मुंबई दि.15(एम एमसी न्यूज नेटवर्क): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ८ एप्रिल २०२५ ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत “सामाजिक समता सप्ताह” मुंबई विभागात उत्साहात साजरा करण्यात आला. या सप्ताहात विविध उपक्रमांच्या माध्यमातून विभागाच्या योजनांचा लाभ सुमारे १ लाख नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात यश आले. अशी माहिती समाज कल्याण विभाग मुंबईचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, मुंबई विभाग यांनी दिली.
१४ एप्रिल रोजी सप्ताहाचा मुख्य कार्यक्रम “चैत्यभूमी”, दादर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट, मुख्य सचिव सुजाता सौनिक, प्रधान सचिव हर्षदिप कांबळे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या सप्ताहाचे उद्घाटन ८ एप्रिल रोजी कोकण भवन येथील प्रादेशिक उपायुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आले. यावेळी बाळासाहेब सोळंकी यांनी सप्ताहादरम्यान होणाऱ्या विविध कार्यक्रमांची सविस्तर माहिती पत्रकारांना दिली.
मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यांत सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली वसतीगृहांमध्ये निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, मार्जिन मनी कार्यशाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्नेहमेळावा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ठाणे जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय भवन येथे मार्जिन मनी कार्यशाळा आणि रक्तदान शिबिर घेण्यात आले. पालघर जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त पांडुरंग वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संविधानाची जनजागृती व्हावी यासाठी पाचबत्ती चौक ते आंबेडकर चौक दरम्यान भीम पदयात्रा काढण्यात आली. रायगड जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली खोपोली येथील संगम रिसॉर्टमध्ये मार्जिन मनी योजनेअंतर्गत कार्यशाळा आयोजित करण्यात आली, तसेच महात्मा फुले जयंतीनिमित्त अलिबाग येथे विशेष कार्यक्रम घेण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त श्री. दीपक घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली एम.एस. आयुर्वेदिक महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. तसेच बाबासाहेबांचे मूळगाव असलेल्या आंबवडे (ता. मंडणगड) येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करून बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांच्या मार्गदर्शनाखाली ओरस येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये त्यांना समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली. तसेच वेंगुर्ला येथे स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.
या सप्ताहाच्या निमित्ताने ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण कार्यालयांमार्फतही विविध उपक्रम राबवण्यात आले. संपूर्ण सप्ताहात झालेल्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिक समतेचा संदेश पोहोचवण्यात आला असून, विभागाच्या योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणावर नागरिकांपर्यंत पोहोचला आहे, असे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांनी सांगितले.