अखिल भारतीय आदिवासी सेनेचा एल्गार

मुंबई दि.2(प्रतिनिधी) : अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारकडे लक्षवेधी मोर्चा काढण्यात आला. “संविधान बचाव, देश बचाव” या घोषवाक्याखाली आयोजित या मोर्चात आदिवासी समाजाच्या हक्कांचे रक्षण, बेरोजगारी, शिक्षण आणि सामाजिक न्याय यांसारख्या प्रलंबित प्रश्नांवर आवाज उठवण्यात आला.
नाशिक जिल्ह्यातील राघोजी भांगरे राष्ट्रीय स्मारक तातडीने पूर्ण करावे, तसेच महाबोधी विहाराचा बौद्ध भिख्खू संघाच्या ताब्यात हस्तांतरण करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच जातीपातीच्या नावावर होणाऱ्या दंगली आणि धमक्यांवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले.
याशिवाय, मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. तसेच दादर रेल्वे स्थानकाचे अधिकृत नामकरण ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस’ म्हणून करावे आणि रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी योग्य नियोजन करावे, अशी मागणी मोर्चाच्या माध्यमातून झाली.
या मोर्चाचे नेतृत्व अखिल भारतीय आदिवासी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दि. ना. उघाडे यांनी केले. राज्य आणि केंद्र सरकारने या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.