रायगड जिल्ह्यातील मत्स्योत्पादनात मोठी घट

अलिबाग, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईला लागून असलेल्या आणि त्यामुळेच येथील माशांना मोठी मागणी असलेल्या रायगड जिल्ह्यात यावर्षी मत्स्योत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. वर्षभरात ८१ हजार टनाने घट झाली याचा परिणाम मच्छीमारांच्या आर्थिक स्थितीवर होत असून चालू वर्षातही मत्स्य उत्पादन कमी होण्याची भीती जिल्ह्यातील मच्छीमारांना सतावत आहे. खोल समुद्रात जाऊनही मासे मिळत नसल्याने जीवना बंदर, आगरदांडा, एकदरा, माखर प्राक्षी, बोडी बंदरात काही दिवसांपासून अनेक नौका नांगरून ठेवल्या आहेत, मासेमारीला गेल्यानंतर होणारा खर्चही निघत नाही. वाढलेले इंधनाचे दर, भरमसाठ मजुरी आणि बोटीच्या डागडुजीसाठी होणाऱ्या खर्चात मच्छीमारही कर्जबाजारी होत आहेत.
मत्स्य उत्पादन घटण्यामागे नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणे आहेत. हवामानात बदल, किनारपट्टीवर येणारी वादळे आणि प्रदूषण या घटकांचा समावेश आहे, तर मानवनिर्मित कारणांमध्ये अनियंत्रित आणि बेसुमार मासेमारी, परप्रांतीय नौकांकडून राज्याच्या सागरी हद्दीत केली जाणारी मासेमारी, एलईडी दिव्यांच्या साह्याने पर्ससीन नेटच्या वापरामुळे मासेमारीवर परिणाम होतो. वादळात समुद्र खवळतो. मासे खोल समुद्रात निघून जातात, त्यामुळे किनारपट्टीवरील भागात मासे मिळण्याचे प्रमाण कमी होते.
SL/ML/SL
11 Jan. 2025