धारावी पुनर्विकासाबाबत सरकार काढणार श्वेतपत्रिका
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी धारावीच्या पुनर्विकासाच्या प्रश्नाबाबत अनेकदा चर्चा होतात. अदानी समुह धारावीचा पुनर्विकास करणार असल्याच्या चर्चाही होत आहेत. मात्र याबाबत ठेस निर्णय होताना दिसत नाही, याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. याला उत्तर देताना धारावी पुनर्विकास प्रकल्पात कुठलाही घोटाळा झाला नसून केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून हा प्रकल्प राबवित आहेत. तरीही पृथ्वीराज चव्हाण यांच्या मागणीनुसार या प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी विधानसभेत दिली.
विखे पाटील असेही म्हणाले की,धारावी पुनर्विकास प्रकल्प हा माझ्या अखत्यारित येत नाही. तरीही ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली, त्या मागणीचा विचार करत श्वेतपत्रिका काढण्यात येईल. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की मुलुंड,देवनार, कुर्ला येथे पुनर्वसन करण्याआधी जमीन खरेदी करावी लागणार आहे,त्यामुळे पैशांचा अपव्यय होण्याची भीती आहे.याआधी वर्षा गायकवाड यांनीही धारावी पुनर्विकासाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता.आता त्या संसदेत उपस्थित करतील. धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली जमीन बड्या कंपन्यांना देण्याचा डाव असून वर्षानुवर्षे धारावीत राहणाऱ्यांना मुंबई बाहेर फेकण्याचा डाव आहे, असेही चव्हाण म्हणाले.
धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मुलुंड,देवनार, कुर्ला येथे धारावीकरांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.यासाठी राज्य सरकार कोट्यवधी रुपये खर्च करणार आहे.यात धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली गैरव्यवहार होत असून आमचे सरकार आल्यावर चौकशी करून धारावी प्रकल्प रद्द करण्यात येईल असे विधानसभा सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.यावेळी धारावी पुनर्विकास प्रकल्पात पारदर्शकता असल्यास श्वेतपत्रिका काढा, अशी मागणीही चव्हाण यांनी केली.यावर उत्तर देताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्वेतपत्रिका काढली जाईल असे सांगितले.
SL/ML/SL
10 July 2024