माऊली माऊलीच्या जयघोषात चांदोबाचा लिंब येथे उभे रिंगण संपन्न
सातारा, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी अडीच दिवसाच्या लोणंद येथील मुक्कामा नंतर दुपारी तरडगाव या ठिकाणी मुक्कामासाठी पालखी निघाली. दुपारी श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीला नैवेद्य दाखवल्यानंतर पुन्हा एकदा नव्या जोमामध्ये वारकरी दिंड्या चांदोबांचा लिंब या ठिकाणी जाण्यासाठी निघाले. केंद्र सरकारच्या वतीने पालखी महामार्गाचे रुंदीकरण केल्यानंतर आता वारकऱ्यांना जाण्यासाठी पालखी स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे चांदोबा मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून जुने मंदिर रस्त्याच्या शेजारी असल्यामुळे ते पाठीमागे घेऊन नवीन मंदिर उभारण्यात आलेले आहे.
चांदोबाचा लिंब या ठिकाणी पारंपारिक पद्धतीने नुसार दुपारी चारच्या सुमारास माऊलीचा रथ येऊन थांबला त्या ठिकाणी नगारे वाजू लागले आणि चोपदाराने उभ्या रिंगणासाठी तयारीचे आदेश दिले. दोन्ही बाजूने वारकऱ्यांनी रांगा करत टाळ मृदंगाच्या नादामध्ये जयघोष यास सुरुवात केली. कर्नाटक येथील अंकलीकर शितोळे सरकार यांच्या घोड्यास ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये मान असतो. अखेर सर्वांची उत्खंठा वाढवणारा नेत्र दीपक माऊलीच्या उभ्या रिंगणास सुरुवात झाली आणि काही मिनिटातच हे रिंगण पूर्ण झाले.
अश्वाच्या पायाखालील माती आपल्या मस्तकावर लावून जीवन धन्य झाल्याचा अनुभव वारकऱ्यांनी घेतला. लोणंद ते तरडगाव मार्गावर उभ्या रिंगणाच्या प्रसंगी अनेक सेवाभावी संस्थांनी अन्नदान आणि आरोग्य विषयक सुविधा वारकऱ्यांना पुरवलेल्या होत्या. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने सुरक्षा आणि स्वच्छतेविषयी विशेष काळजी घेतलेली होती.
ML/ML/SL
8 July 2024