लोकसभेत मोदी सरकारवर अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू

 लोकसभेत मोदी सरकारवर अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू

नवी दिल्ली, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २०२४ ची लोकसभा निवडणूक आता काही महिन्यांवर आली असताना विरोधी पक्ष एकत्र येत सत्ताधारी भाजपला चांगलेच कोंडीत पकडत आहेत. मणिपूर हिंसाचारावरून देशभर सरकारवर टिका सुरू असताना लोकसभेत केंद्र सरकारविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. या अविश्वास प्रस्तावावर विरोधक आणि सत्ताधारी खासदारांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. यामुळे लोकसभेतलं वातावरण तापलं असून जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधकांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांना उद्या गृहमंत्री अमित शहा उत्तर देणार आहेत.

आज दुपारी 12 वाजल्यापासून चर्चा सुरू झाली. विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या एकजुटीची चाचपणीदेखील याद्वारे होणार आहे. संख्याबळानुसार केंद्र सरकारला सध्या तरी कोणताही धोका नाही. आज अविश्वास प्रस्तावावर काँग्रेसचे खासदार तरुण गोगई यांनी सुरुवात केली. काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले की, ‘पंतप्रधानांना हे मान्य करावे लागेल की त्यांचं डबल इंजिन सरकार, मणिपूरमधील त्यांचं सरकार अपयशी ठरलं आहे. त्यामुळे मणिपूरमध्ये 150 लोकांचा मृत्यू झाला. सुमारे 5000 घरे जाळली गेली, सुमारे 60,000 लोक मदत शिबिरात आहेत आणि सुमारे 6500 एफआयआर नोंदवले गेले आहेत. ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संवादाचे, शांततेचे आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण करायला हवे होते, त्यांनी चिथावणीखोर पावलं उचलल्याने समाजात तणाव निर्माण झाला असल्याचा हल्लाबोल केला. काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले की, “पंतप्रधान मोदी केवळ मणिपूरवरच नव्हे तर अदानी मुद्द्यावरही मौन बाळगून आहेत. चीनबाबतही मौन सोडलं नाही. पंतप्रधान मोदी त्यांची चूक मान्य करत नाहीत असे गोगोई यांनी म्हटले. अदानींच्या नावाचा उल्लेख झाल्यानंतर भाजप खासदारांनी गोंधळ घातला.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या नऊ वर्षांच्या कामाचा पाढा वाचून काढला आहे. महागाई, बेरोजगारी हे मोदी सरकारचं मोठं अपयश असल्याची टीका करत सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

शिवसेना शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातल्या कारभाराचे वाभाडे यानिमित्तानं सभागृहात काढले. मुख्यमंत्री यांनी घरी बसून काम करण्याचा एक रेकॉर्डच केला अशी टीका त्यांनी केली. तर खासदार अरविंद सावंत यांनी नंतर पळपुट्या लोकांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये अशी टीका तर करत त्याला प्रत्युत्तर दिलं. श्रीकांत शिंदे महाराष्ट्रातल्या राजकारणावरुन बोलत असताना समोरच्या बाकावरुन त्यांना हनुमान चालिसा म्हणून दाखवण्याचं चँलेज आलं, त्यावर त्यांनी सभागृहातच हनुमान चालिसा ऐकवली. शिंदे ठाकरे गटाच्या या जुगलबंदीत नंतर भर पडली ती नारायण राणे यांच्या भाषणानं. राज्यसभेचे सदस्य असले तरी केंद्रीय मंत्री म्हणून त्यांना या भाषणात बहुदा या प्रत्युत्तरासाठीच छोटीशी संधी दिली होती. भाषणं ऐकून महाराष्ट्राच्या विधानसभेत असल्यासारखं वाटतंय असं म्हणत नंतर त्यांनी शिवसेना, ठाकरे या विषयावरच तोफ डागली.

आजच्या अविश्वास ठरावाचे पहिले भाषण राहुल गांधी करतील अशी अटकळ बांधण्यात येत होती. मात्र, राहुल गांधी यांनी भाषण केले नाही. राहुल गांधी यांच्या भाषणाबाबत काँग्रेसकडून अचानक रणनीतीमध्ये बदल करण्यात आला. पंतप्रधान मोदी सभागृहात उपस्थित नसल्याने राहुल गांधी यांनी पहिलं भाषण केलं नाही. ज्या दिवशी मोदी सभागृहात त्याच दिवशी राहुल गांधी भाषण करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान १० तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी या अविश्वास प्रस्तावाबाबत आपली भूमिका मांडणार आहेत. त्यानंतर सभागृहात मतदान घेण्यात येऊन भाजप सरकार पडणार की तरणार हे निश्चित होईल.

SL/KA/SL

8 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *