समीर वानखेडे यांना 8 जूनपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आर्यन खान प्रकरणात एनसीबीचे माजी झोन डायरेक्टर समीर वानखेडे यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने 8 जून पर्यत दिलासा दिला. याचवेळी मीडिया ट्रायल होऊ नये याची दक्षता घेण्याचे कडक निर्देश न्यायालयाने दिले आहेत.समीर वानखेडे यांच्याकडे ‘एनसीबी’च्या मुंबई विभागीय संचालकपदाची जबाबदारी असताना त्यांच्या पथकाने ऑक्टोबर २०२१ मध्ये मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवर छापा घातला होता. या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही ताब्यात घेण्यात आले होते.त्याला सोडवण्यासाठी समीर वानखेडे यांनी २५ कोटींच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपाप्रकरणी ‘एनसीबी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासही केला. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. तपासानंतर सीबीआयने समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्याविरोधात समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.आज ( २२ मे ) उच्च न्यायालयात न्यायमूर्ती अभय आहुजा, न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. सीबीआयच्या वकिलांनी केलेल्या आरोपांची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. समीर वानखेडे यांचे वकील आबाद पोंडा यांचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला आहे. मात्र याचवेळी मीडिया ट्रायल होऊ नये याची दक्षता घेण्याचे कडक निर्देश न्यायालयाने दिले आहेत. * न्यायालयाने कोणकोणते प्रतिबंध घातले* तपासासंदर्भात कोणतीही माहिती अथवा मेसेज देण्यास न्यायालयाने समीर वानखेडे यांना प्रतिबंध घातले आहेत. शिवाय चौकशी आणि तपासात सीबीआयला सहकार्य करण्याचे निर्देश वानखेडे यांना दिले आहेत. कोर्टाने सीबीआयला 3 जूनपर्यंत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या असून 8 जून रोजी पुन्हा सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे सुनावणी होईपर्यंत समीर वानखेडे यांना अटकेपासून दिलासा कायम आहे.
ML/KA/PGB 22 May 2023