गझल-गीतांतून उलगडली महामानवांची महती

 गझल-गीतांतून उलगडली महामानवांची महती

पुणे, दि ५: बुद्ध पौर्णिमेनिमित्त ‘विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समिती’तर्फे आयोजित ‘बुद्ध धम्म संध्या’ कार्यक्रमात गझल व गीतांच्या माध्यमातून तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रभावी मांडणी करण्यात आली. पुणे विद्यापीठातील तथागत गौतम बुद्ध विहार येथे झालेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

“वंदितो तुला मी गौतमा”, “मुक्ती दिन हा मानवतेचा”, “सांगा बहुजनास आता संपला वनवास”, “चंदन वृक्ष समान होता भीमराव” अशा गीतांमधून कलाकारांनी महामानवांच्या कार्याचा आणि मानवतेच्या संदेशाचा सुरेल आविष्कार सादर केला. ज्येष्ठ गझल गायक अशोक गायकवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गीत-गझलांच्या माध्यमातून बुद्धांच्या करुणा व आंबेडकरांच्या समानतेच्या विचारांचा प्रभावी संदेश दिला.

कार्यक्रमाची सुरुवात “तथागत तुझा धम्म आचरणी” या गीताने झाली. त्यानंतर “हृदयी वसे माझ्या बुद्ध पिंपळाचा पार”, “भीमा तुझ्या कृपेने जगणे झाले सोपे”, “अंधारमय नभात उजळून भीम गेला” यांसारख्या गीतांनी वातावरण भारावून गेले. “भीमा सारखा हिरा अलौकिक जगात दुसरा कोणीच नाही” या ओळींनी रसिकांची दाद मिळवली.

या कार्यक्रमाला समितीचे अध्यक्ष व उपमहापौर परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, संत गाडगेबाबा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, नगरसेवक सनी निम्हण आदी मान्यवर उपस्थित होते.

संगीतसाथ निखिल वाघमारे (तबला), श्याम चंदनशिव (ढोलक), अवधूत धायगुडे (साईड रिदम), अमोल मांढरे (कीबोर्ड), अझरुद्दीन शेख (बासरी) व रुपेश मोरे (हार्मोनियम) यांनी केली. धम्मचारिणी गुणमेघा यांनी निवेदन, तर दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले.

महोत्सवाच्या निमित्ताने अशोक गायकवाड म्हणाले की, “महाराष्ट्रात अनेक राजकारणी आहेत; मात्र तथागत गौतम बुद्धांविषयी प्रेम, करुणा आणि आस्था जपणारे परशुराम वाडेकर यांचे कार्य वेगळेपणाने उठून दिसते. या सांस्कृतिक महोत्सवातून बुद्धांच्या विचारांचा वारसा आणि डॉ. आंबेडकरांचा समानतेचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम होत आहे.”KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *