मुंबई काँग्रेसच्या ‘राष्ट्रीय टॅलेंट हंट’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद.
मुंबई प्रतिनिधी
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने सुरु केलेल्या टॅलेंट हंट अभियानाला मुंबईतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मुंबईतून विविध क्षेत्रातील १०० इच्छुकांनी यासाठी अर्ज केले होते. मुंबई काँग्रेसचे कार्यालय राजीव गांधी भवन येथे प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. टॅलेंट हंट अभियानातून पक्ष प्रवक्ते, मीडिया पॅनेलिस्ट, संशोधन समन्वयक आणि प्रसिद्धी समन्वयक या पदांच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील प्रतिभावान लोकांना काँग्रेस पक्षाची विचारधारा, संविधान, लोकशाही रक्षणाचे काम करण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली.
काँग्रेस पक्षासाठी काम करु इच्छिणाऱ्या विविध क्षेत्रातील तज्ञांना काँग्रेस पक्ष एक व्यासपीठ मिळवून देणार आहे, त्यासाठी देशभर टॅलेंट हंट अभियान सुरु करण्यात आले आहे.या अभियानांतर्गत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते, या अर्जांची छाननी केल्यानंतर काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, ज्येष्ठ व अनुभवी पत्रकार तसेच तज्ञ लोकांच्या एक समितीने प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या असून यातुन अंतिम निवड करण्यात येणार आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिल्लीचे माजी आमदार हरिशंकर गुप्ता, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत, मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस, आनंद शुक्ला, शितल म्हात्रे, भावना जैन आणि पत्रकार रश्मी पुराणिक यांनी टॅलेंट हंटसाठी मुलाखती घेतल्या.